Marathi News> मनोरंजन
Advertisement

माधुरी- संजय दत्तच्या प्रेमप्रकरणात असं कोणतं वळण आलं, जेव्हा अभिनेत्याला मागावी लागली माफी

वास्तव हेच होतं की या नात्यांचा प्रेमाचा प्रवास अर्ध्यावरच संपला.   

माधुरी- संजय दत्तच्या प्रेमप्रकरणात असं कोणतं वळण आलं, जेव्हा अभिनेत्याला मागावी लागली माफी

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्या प्रेमाच्या, नात्याच्या चर्चा तर खूप झाल्या. पण, हे नातं पुढे पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. याला कारणं अनेक असतील. पण वास्तव हेच होतं की या नात्यांचा प्रेमाचा प्रवास अर्ध्यावरच संपला. 

चर्चेत असणाऱ्या या जोड्यांमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता संजय दत्त यांच्याही नात्याचा समावेश आहे. (Madhuri Dixit, Sanjay Dutt)

संजूबाबा आणि 'धकधक गर्ल' माधुरीच्या अफेअरची चर्चा त्या वेळी सर्व मासिकं आणि माध्यमांसाठी महत्त्वाचा विषय ठरली होती. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळं लक्ष वेधणाऱ्या या जोडीमध्ये ऑफस्क्रीन प्रेमही बहरल्याचं म्हटलं गेलं. 

या दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पण, बॉलिवूडमधील अनेकांनीच दिलेल्या माहितीनुसार मैत्रीच्याही पलीकडेही त्यांचं नातं पोहोचलं होतं. 

मुख्य म्हणजे या नात्यात एक वळण असंही आलं जिथे अखेर संजय दत्त याला माधुरीची माफी मागावी लागली होती. 

1993 नंतर या जोडीबद्दलच्या अनेक गोष्टी जाहीरपणे चर्चेत येऊ लागल्या. असं म्हटलं जातं की त्यानंतरच संजयनं माधुरीची माफी मागितली होती. 

एका मुलाखतीत संजयनं नेमकं काय घडलं याची माहिती दिली होती. 

'साजन या चित्रपटाच्या वेळी माध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली. नंतर ती केनियामध्ये 'खेल' च्या चित्रीकरणासाठी गेली होती. परतल्यानंतर जेव्हा 'साजन'चं चित्रीकरण सुरु झालं, तेव्हा मी तिच्याकडे जाऊन माफी मागितली होती. 

ती अनेकांच्याच निशाण्यावर आली होती, जिथं तिचा काहीच दोष नव्हता. इथंही तिनं परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली', असं संजय म्हणाला. 

आपल्यामध्ये काहीही नातं नसतानाही लग्नाच्या अफवा उठल्या. मुळात लग्नासाठी तिच्याशी काही नातं तरी हवं, असंही तो म्हणाला होता. 

संजूच्या पहिल्या पत्नीला होती माधुरीसोबतच्या नात्याची कल्पना...
संजय आणि माधुरीच्या नात्याची त्याच्या पहिल्या पत्नीला पूर्ण कल्पना होती. किंबहुना आपल्याला माधुरीनं एकटं पाडल्याचं पाहून तो हादरला होता. 

'आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्याला कोणाचीतरी साथ हवी होती. त्याला भावनिक आधाराची गरज होती. 

जसंकी तो माधुरीवर अवलंबून होता. तिनं त्याला सोडलं, आणि तो पूरता हादरुन गेला होता', असं ती मुलाखतीत म्हणाली होती. 

पुढे जेव्हा माधुरीनंच संजयला टाळण्यास सुरुवात केली, तेव्हा ती माझी सहकलाकार होती आणि सहकलाकारांशी मी चांगलं नातं जपतो मग ती माधुरी असो किंवा श्रीदेवी असं वक्तव्यं त्यानं केलं होतं. 

Read More