Aaradhya Bachchan: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या नेहमीच तिच्या पालकांसोबत दिसते. आराध्याने बच्चन कुटुंबाच्या आयुष्यात आनंद आणलाय. ऐश्वर्या आणि अभिषेक आराध्याला एका खास पद्धतीने वाढवत आहेत. अभिषेकने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत आराध्याला आम्ही कशाप्रकारे वाढवतोय, याबद्दल माहिती दिली. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत, अशा पालकांना ही माहिती उपयोगाची आहे. अभिषेकने त्याची मुलगी आराध्याच्या पालनपोषणाचे सर्व श्रेय पत्नी ऐश्वर्या रायला दिले आहे.
अभिषेक बच्चनने नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत आराध्याबद्दल सांगितले. 'मी आराध्याच्या संगोपनाचे सर्व श्रेय तिच्या आईला देऊ इच्छितो. मला बाहेर जाऊन चित्रपट बनवण्याची स्वातंत्र्य आहे पण ऐश्वर्याने आराध्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. ती खूप छान आहे. मला हे खूप आश्चर्यकारक वाटते', असे अभिषेकने मुलाखतीत म्हटले.
तरुण मुले इंस्टाग्राम, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर व्यस्त असताना आराध्या या सर्व गोष्टींपासून दूर राहते. माझी मुलगी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आणि तिच्याकडे फोनही नाही, असे अभिषेकने सांगितले. 'ती कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आणि तिच्याकडे फोनही नाही. मला वाटतं की ती एक कर्तव्यदक्ष मुलगी म्हणून वाढली आहे. ती वैयक्तिकरित्या जे आहे ते मी तिच्यापासून हिरावून घेऊ इच्छित नाही. ती एक अतिशय सुंदर छोटी मुलगी बनत आहे. ती आमच्या कुटुंबाचा अभिमान आहे. आम्ही भाग्यवान आहोत.', असे सांगत अभिषेकने लेकीचं कौतुक केलं. अभिषेक बच्चनचा 'कालिधर लपटा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. Zee5 वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला खूप पसंती मिळतेय. याशिवाय अभिषेक लवकरच शाहरुख खानसोबत 'किंग मॅन'मध्ये दिसणार आहे. अभिषेक बच्चन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल अशी माहिती समोर येत आहे.
नयनदीप रक्षित यांच्याशी त्यांच्या युट्यूब चॅनलवर झालेल्या संभाषणात अभिषेकने ऐश्वर्यासह झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. “मी माझ्या वडिलांच्या मृत्युदत्ता चित्रपटाच्या रेकीसाठी स्वित्झर्लंडमध्ये मेहुल कुमार यांच्यासोबत होतो. मी तिथेच वाढलो असल्याने माझ्या आईने मला पाठवलं होतं. मी तिथल्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो होतो, त्यामुळे त्यांना वाटलं की कदाचित मी तेथील चांगल्या जागा दाखवू शकतो. बॉबी (देओल) सोबत माझी खूप मैत्री होती, तो 'और प्यार हो गया' या चित्रपटाचं शूटिंग करत होता आणि ज्या दिवशी आम्ही रेकीवर होतो, तेव्हा आम्ही सेटवर भेट घेण्यासाठी पोहोचलो होतो. तो ऐश्वर्यासोबत शूटिंग करत होता. त्यावेळी मी तिला पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिले. म्हणजे, आम्ही तिला मिस वर्ल्ड आणि त्या सर्व काळात आधीच पाहिले होतं”.त्यानंतर त्यांच्यात एक नकळत भेट झाली, जी त्यांच्या भविष्याचा पाया रचणारी होती. "त्या संध्याकाळी बॉबी म्हणाला, 'तू माझ्या हॉटेलमध्ये का येत नाहीस, आपण एकत्र जेवू?' मी मिकी कॉन्ट्रॅक्टरला चांगला ओळखत होतो. तो तिचा मेकअप करत होता आणि माझ्या आईचा मेकअपही केला होता. त्याने मला लहानपणी पाहिलं होते. म्हणून आम्ही सर्व एकत्र बसलो होतो आणि तेव्हाच मी तिला पहिल्यांदा भेटलो". आपण डिनरदरम्यान जे काही बोलत होतो त्यातील काहीच ऐश्वर्याला कळत नव्हतं असा खुलासा अभिषेकने केला आहे. "तिने मला नंतर सांगितलं की, तिला मी बोललेला एकही शब्द समजला नाही कारण माझा उच्चार खूप जड होता," अशी आठवण त्याने हसत सांगितलं.
स्वित्झर्लंडमध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली असली तरी, त्यांची प्रेमकहाणी काही वर्षांनंतर सुरू झाली. अभिषेकने मणिरत्नम यांच्या 'गुरू' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्याला प्रपोज केले. त्याने तिला चित्रपटात घातलेल्या त्याच अंगठीने प्रपोज केले. जानेवारी 2007 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि एप्रिलमध्ये त्यांनी लग्न केलं.