Amitabh Bachchan : हिंदी कलाविश्वामध्ये महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीमधील एका अनपेक्षित वळणाची फार कमी चाहत्याना कल्पना आहे. गेली कैक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या जीवनात काही वर्ष आव्हानाचीसुद्धा होती. इतकी, की त्यांनी चक्क देशही सोडण्याचा निर्णय घेतला होता.
भारतातील सुपरस्टारपैकी एक असणाऱ्या आणि हिंदी सिनेजगतामध्ये प्रचंड मानसन्मान मिळणाऱ्या कलाकारांमध्ये बिग बींचं नाव कायमच आघाडीवर येतं. पण, याच कलाकारानं एका टप्प्यावर भारतापासून दूर थेट 69000 किमी अंतरावरच्या एका परराष्ट्रामध्ये एकांतवासाच राहण्याचा निर्णय घेतला होता. असं म्हणतात कलात्मक दृष्टीकोनातून साचेबद्धपणाची जाणीव त्यांना झाली आणि इथंच असंतुष्टतेच्या भावनेनं त्यांच्या मनात घर केलं आणि त्यांनी बॉलिवूडपासून दुरावा पत्करला.
स्वित्झर्लंडमध्ये जवळपास दोन वर्षे अमिताभ बच्चन एकटे राहिले आणि तिथून ते एका नव्या उमेदीनं, आशेनं आणि प्रचंड सकारात्मकतेनं मायदेशी परतले.
विविध भाषांमधील चित्रपट साकारण्यासाठी या मेगास्टारनं अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) ही कंपनीसुद्धा सुरू केली. मात्र त्यांच्या या निर्णयाला नियतीनं साथ दिली नाही आणि पाहता पाहता कंपनी दिवाळखोरीस निघाली. परिस्थिती इतकी बिघडली की त्यांना कर्ज फेडण्यासाठी जुहूतील घरंही विकावं लागलं. मात्र 2000 हे तेच वर्ष होतं जेव्हा त्यांच्या कारकिर्दीला नव्यानं वेग धरला. 'कौन बनेगा करोडपती', 'मोहब्बतें' यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी पुनरागमन केलं आणि तिथपासून कधीही मागे वळून पाहिलं नाही.
बिग बींच्या या कारकिर्दीविषयी खुद्द ज्येष्ठ अभिनेत्रे रजनीकांत यांनीच एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं. आपण बच्चन यांना आदर्शस्थानी का ठेवलं आहे, याबाबत सांगतान रजनीकांत म्हणाले होते, 'कारकिर्दीत साधारण 57-58 व्या वर्षी अमिताभ बच्चन यांना त्याच्या कामात तोचतोचपणा येत असल्याचं जाणवलं आणि त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये एक अपार्टमेंट खरेदी करून तिथं वास्तव्यास सुरुवात केली.' बिग बींच्या कंपनीसंदर्भातील माहितीसुद्धा त्यांनी देत या कलाविश्वाचं वास्तव समोर आणलं. 'तुम्ही सावध राहिला नाहीत, तर समजा तुम्ही संपलात... हेच या कलाजगताचं दु:खद सत्य आहे', असं ते म्हणाले होते.
रजनीकांत यांनी त्या कार्यक्रमादरम्यान एक अशी गोष्ट जगासमोर आणली जी ऐकून बऱ्याचजणांच्या भुवया उंचावल्या. बच्चन यांच्या अपयशानं अनेकांना आनंद झाला होता, पण या कठीण परिस्थितीचा सामना त्यांनी एकट्यानं केला असं सांगताना इथं तुमची लहानशी चूकसुद्धा अनेकांना आनंद देऊन जाते असा कलाविश्वाचा अनपेक्षित चेहरा त्यांनी सर्वांसमोर आणला. अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अपयशाचा सामना केल्यानंतर टप्प्याटप्प्यानं यशाची वाट धरली, ते कायम स्वत:साठी नियतीशीसुद्धा झगडले असं सांगताना बिग बी आपल्या आदर्शस्थानी का आहेत हेच रजनीकांत यांनी स्पष्ट केलं.