Kangana Ranaut on Raja Raghuvanshi Murder Case: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतने नुकताच चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडावर अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने या घटनेला अमानुष्य आणि समाजासाठी घातक असे म्हंटले आहे. कंगनाची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. लग्नानंतर मेघालयमध्ये हनीमूनवर गेलेल्या राजाला, पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) आणि तिचा प्रियकर, तसेच दोन इतर लोकांनी मिळून हत्या केली असा आरोप आहे.
कंगना राणौतने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर केली आणि संपूर्ण घटनेवर नाराजी व्यक्त केली. तिने असा प्रश्न उपस्थित केला की, एखादी मुलगी तिच्या पालकांच्या भीतीने लग्नाला नकार का देऊ शकत नाही, पण ती तिच्या प्रियकरासह तिच्या पतीचा खून करण्याचा कट का रचू शकते? तिने पुढे लिहिले की, अशी मानसिकता समाजासाठी एक मोठा धोका आहे आणि ती हलक्यात घेऊ नये.
तिच्या पोस्टमध्ये कंगनाने असेही म्हटले आहे की, समाज मूर्ख लोकांना चेष्टेचा विषय समजून हसतो, पण प्रत्यक्षात तेच सर्वात मोठा धोका असतात. तिने लिहिले, 'बुद्धिमान लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान करतात, परंतु मूर्ख लोकांना स्वतःला माहित नसते की ते काय करत आहेत. असा मूर्खपणा अत्यंत धोकादायक आहे.'
शिलाँग पोलिसांनी तीन संशयितांना सात दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर घेतलं. चौथा आरोपी आनंद, मध्य प्रदेशाच्या सागर जिल्ह्याचा, तो इंदोरमधून अटकेत घेण्यात आला. सर्व आरोपींचं पुढील तपास शिलाँगमध्ये करण्यात येणार आहे.
या सनसनीखेज घटनेनंतर राजा-सोनमचे लग्नाचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. नेटिझन्स म्हणतात, काही दिवसांपूर्वी प्रेमाचं प्रतीक वाटणाऱ्या या व्हिडीओ-फोटोमध्ये आता भीषण सत्य दडलेलं आहे.