'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता-दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे चर्चेत आहे. याला कारण आहे राशीचक्रकार शरद उपाध्येंनी केलेली पोस्ट आणि गंभीर आरोप. 'तुझ्या डोक्यात हवा गेलीय' असा आरोप शरद उपाध्येंनी आरोप केले आहेत. या सगळ्यावादावर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील एका कलाकाराने आपलं स्पष्ट मत मांडल आहे.
अभिषेक बरहाते पाटील असं या कलाकाराचं नाव असून त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. अभिषेकने ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात काही स्किट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या शोमधील त्याचं किम जोंग-उन ही भूमिका विशेष गाजली. अभिषेक पोस्टमध्ये असं म्हणतो, “सन्मा. शरद उपाध्ये साहेब. तुमची डॉ. निलेश साबळे यांच्याबद्दलची एक पोस्ट वाचली. ते डॉक्टर ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या गावातल्या मुलांची स्वप्नं साकार झाली. त्या माणसाबद्दल वाईट, अपमानास्पद बोललं गेलं.” अशी सुरुवात केली आहे.
प्रति
सन्मा.शरद उपाध्ये साहेब
आज तुमची एक पोस्ट वाचली.
डॉक्टर निलेश साबळे यांच्याबद्दलची ते डॉक्टर ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या गावातल्या मुलांची स्वप्नं साकार झाली.त्या माणसाबद्दल वाईट, अपमानास्पद बोललं गेलं.
"डोक्यात हवा गेलीय",
"याला आपणच मोठं केलं..."
"सगळा अभिनय फक्त स्वतःचा शोभा वाढवायला..."
असं किती काही वाचायला मिळालं.आणि खरं सांगायचं, तर राग आला. पण त्याहून जास्त खंत वाटली.
कारण तुम्ही टीका केली त्या माणसावर, ज्यांनी लोकांमध्ये चेहरा नसलेल्या, आवाज नसलेल्या, नाव नसलेल्या मुलांना नाव दिलं, आवाज दिला, आणि स्टेज दिला.
हो, मी गावाकडचा आहे.
शुद्ध भाषेचा अभाव बोलण्याची भीती होती.अभिनय माहीत नसलेला पण तेव्हा कोणीतरी होता ज्याने आमच्या सारख्या गावठी वर विश्वास ठेवला.आम्ही काहीतरी करू शकतो – हे पहिल्यांदा दाखवून दिलं.
डॉक्टर निलेश साबळे आमचे मार्गदर्शक,आमची ओळख.
ज्या शो बद्दल आपण बोलला चला हवा येऊ द्या विषयी
शून्य जाहिरातीतून, शून्य गॉसिपमध्ये राहून...फक्त कामावर विश्वास ठेवत तो शो अविरत पणे चालवला तो साबळे सरांनी आणि बघता बघता –
तो कार्यक्रम १० वर्ष टिकला.
लोक मराठी शो बदलून पाहायचे,
हिंदी कलाकार मराठीत यायला भाग पडले.पहिला मराठी शो ज्याने हिंदी कलाकार मराठी स्टेज वर आणले.आणि एक दिवस असा आला की –
‘चला हवा येऊ द्या शो’ फक्त मुंबईपुरती मर्यादित गोष्ट राहिली नाही.
कोणी तरी म्हणालं – “स्टारडम डोक्यात गेलंय.”
हो, गेलंय कदाचित –
पण ते डोक्यात गेलेलं ‘हवा’ नाही –
तर अनुभव, संघर्ष, आणि हजारोंच्या पाठीशी उभं राहिलेलं आत्मभान आहे.
आमच्यासारख्या पोरांना लोक विचारायचे – "तू कुठून आलास?"
आज विचारतात – "तू त्या शोमध्ये होता ना?"
ही ओळख फुकट मिळत नाही –
ही ओळख मिळवून द्यायला कोणीतरी आयुष्य घालवतं लागतं.
आणि म्हणूनच,
कोणीही काहीही बोलेल, तरी सत्य बदलत नाही.
ज्यांनी निर्माण केलं, त्यांचं योगदान काही पोस्टने मिटत नाही.
हे सरांचं कौतुक नाही, हे आम्हा सर्वांचं उत्तर आहे.
कारण जिथे आमचा आवाज थांबतो,
तिथे त्यांनी आम्हाला बोलायला शिकवलं.
आणि आज कोणी त्यांच्यावर बोट दाखवत असेल,
तर आम्ही शंभर आवाजांनी त्यांचं नाव पुन्हा पुन्हा उच्चारू.
आमचं शिक्षण, आमचा आत्मविश्वास, आमचं ओळख –
किती मोलाचं असतं हे तुम्हाला समजणार नाही.
कारण तुमचं सगळं काही तयार होतं.
आमचं तर त्यांच्यामुळे सुरू झालं.
तुम्ही टीका करत राहा, आम्ही आदर करत राहू.
कारण तुम्ही नाव घेतलं, आणि आम्ही नाव कमावलं – त्यांच्या बरोबर उभं राहून.
एक गावातला मुलगा
(जो स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलाय-एका माणसामुळे)
डॉ. निलेश साबळेने आपली बाजू मांडल्यानंतर मराठी कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये किरण माने, सलील कुलकर्णी, शिल्पा नवलकर, कविता मेढेकर, अद्वैत दादरकर, अभिजीत केळकर यासारख्या कलाकारांनी डॉ. निलेश साबळेला पाठींबा दिला.