बॉलिवूडला एक नवी ओळख देण्यात पटकथा लेखक सलीम-जावेद यांचा मोलाचा वाटा आहे. या जोडीने बॉलिवूडला जंजीर, दिवार, शोले असे एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. या जोडीमुळे प्रेक्षकांचा पटकथा लेखकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. एक काळ असा होता जेव्हा त्यांचं मानधन चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त असायचं. दोघांनी एकत्रितपणे 20 हून अधिक चित्रपट लिहिले. पण 1982 मध्ये दोघेही वेगळे झाले आणि आपला मार्ग निवडला. सलीम-जावेद वेगळे झाल्याने बॉलिवूडसाठी हा फार मोठा धक्का होता. दोघे विभक्त झाल्यानंतर अनेक अफवा उडाल्या होत्या. पण दौघांपैकी एकानेही त्यावर भाष्य केलं नाही. अनेकांनी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी असणारा निकतवर्तीपणा सलीम खान (Salim Khan) यांना आवडला नाही असा दावा केला. दरम्यान जावेद अख्तर यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे.
सलीम खान हे जावेद अख्तर यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. मात्र कामाच्या बाबतीत दोघांनीही एकमेकांना समान वागणूक दिली. जावेद अख्तर यांनी आपण सलीम खान आणि त्यांच्या पत्नी सलमा खान यांना आई-वडिलांप्रमाणे पाहायचे असं सांगितलं. पण अनेकदा ते त्यांच्या मोठ्या भावासारखे होते, ज्यांचं मत चर्चेदरम्यान अंतिम असे.
'मिड-डे'ला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी सांगितलं की, "जेव्हा आम्ही स्क्रीनप्ले लिहायचो तेव्हा आम्ही समान असायचो. पण आम्ही ज्या संस्कृतीतून आलो होतो तिथे छोट्या मोठ्याचे संस्कार मिळाले होते. ते माझ्यापेक्षा मोठे आणि अनुभवी असल्याने तो छोटे, मोठे असं नात होतं. पण जेव्हा आम्ही काम करायचो, तेव्हा फक्त काम करायचो. काम करताना आम्ही वयातील अंतर पाहिलं नाही. पण काम करत नसताना आम्ही आपले संस्कार पाळायचो".
"पण आम्ही वेगळे झालो तेव्हा परिस्थिती बदलली. अमिताभ बच्चन यांच्याशी माझी जवळीक वाढत असल्याने मी सलीम खान यांच्यापासून वेगळा झालो असं लोकांना वाटलं. या अफवांमुळे मी तब्बल 10 वर्षं अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं नाही. माझ्याकडे अनेक ऑफर्स होत्या, पण मी त्या स्विकारल्या नाहीत. कारण मी दुसऱ्या कोणाचा तरी पाठिंबा असल्याने ही पार्टनरशिप तोडली असा ठपका नको होता. आम्ही वेगळे झाल्यानंतर जो पहिला चित्रपट एकत्र केला तो आझाद होता," असंही जावेद अख्तर यांनी सांगितलं.