Kajol on Cosmatic Surgery : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या बहुचर्चित हॉरर चित्रपट ‘मा’ मुळे चांगलीच चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता सगळ्यांनाच या चित्रपटाच्या थिएटरमधील प्रदर्शानाची आतुरतेनं वाट पाहायला लागली आहे. या दरम्यान काजोलनं तिच्या वाढत्या वयाबद्दल, कॉस्मेटिक सर्जरीवर आणि 'मां' या आगामी चित्रपटावर मोकळेपणानं मत मांडलं. एका अलीकडील मुलाखतीत तिने म्हटलं की वय वाढणं ही काही फार मोठी गोष्ट नाही.
काजोलनं फिल्मफेअरला मुलाखत दिली. यावेळी वयाविषयी बोलताना म्हणाली, 'जोपर्यंत तुम्हाला माहित आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या दिशेनं चालले आहात, तोपर्यंत काही फरक पडत नाही. जर तुम्ही स्वतःला समजून घेतलं असेल तर, वय वाढल्यामुळे आपल्यात असे काही अनेक बदल होत नाहीत.'
काजोल म्हणाली, 'माझं वय किती आहे याने मला काही फरक पडत नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या विचारसरणीनं आयुष्य जगत आहात.' काजोलच्या मते वय हे फक्त एक आकडा आहे आणि खरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयांबाबत समाधानी आहात की नाही.
पुढे कॉस्मॅटिक सर्जवर बोलताना काजोल म्हणाली, 'ही एक गुंतागुंतीची गोष्ट आहे. एखाद्याला असा बर्थमार्क असतो जो त्याच्या आयुष्यात अडथळा ठरतोय, तर तो काढणं योग्य ठरू शकतं. अॅसिड अटॅक किंवा आगीत भाजलेल्या लोकांसाठी सर्जरी गरजेची असते, पण फक्त सुंदर दिसण्यासाठी ती केवळ विचारपूर्वकच करावी. कॉस्मेटिक सर्जरी ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड असू शकते, पण त्यामागे कारण हे योग्य असावं लागेल.'
हेही वाचा : लग्नाआधीच आई झालेली 23 वर्षांची अभिनेत्री आता बोहल्यावर चढणार? 'त्या' PHOTOS मुळे चर्चेला उधाण
उदाहरण देत पुढे काजोल म्हणाली, 'फक्त गाल उठावदार दिसावेत म्हणून सर्जरी करणं आवश्यक नाही. आधी हे समजून घ्या की त्या शरीराच्या भागात खरंच काही बदल करण्याची गरज आहे का? जर उत्तर होय असेल, तर नक्कीच सर्जरी करा. फक्त ट्रेंड म्हणून असं करणं चुकीचं ठरेल.'
काजोल नुकतीच ‘दो पत्ती’मध्ये दिसली आणि आता ती 'मा' या चित्रपटातून एका दमदार भूमिकेसह पुनरागमन करत आहे. 'मा' ही एक मायथोलॉजिकल हॉरर फिल्म असून विशाल फुरिया यांनी ती दिग्दर्शित केली आहे. अजय देवगण आणि ज्योती सुब्बरायन या चित्रपटाचे निर्माते आहेत. यात काजोल एका आईच्या भूमिकेत आहे. ती आपल्या मुलीला राक्षसी शक्तींमधून वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळतोय. चित्रपटातील कलाकारांविषयी बोलायचं झालं तक काजोलसोबत या चित्रपटात इंद्रनील सेनगुप्ता, रोनित रॉय, जितिन गुलाटी आणि खेरिन शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.