अभिनेता सागर कारंडेची ६१ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरुन लाईक करा अन् पैसे मिळवा अशा पद्धतीची स्किम त्यांना सांगण्यात आली होती. व्हॉट्सऍपवर एका अनोळखी महिलेने याबाबत माहिती दिली.
इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक लाईक करा आणि १५० रुपये मिळवा, अशी ही स्किम होती. यामध्ये सागर कारंडे जवळपास ६१ लाखांपर्यंत अडकल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नव्हे सागर कारंडेने या प्रकरणात २७ लाख रुपये गुंतवल्याची देखील माहिती मिळत आहे.
या सगळ्या प्रकरणावर सागर कारंडेने प्रतिक्रिया दिली आहे. सागर कारंडेने या सगळ्यावर स्पष्टीकरण देत म्हटलं की, मला त्या प्रकरणावर बोलायचं नाही, हे सगळं प्रकरण फेक आहे. त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही." तसेच, याप्रकरणावर गुन्हा दाखल झाला आहे, असं विचारल्यावर सागर थोडासा वैतागूनच बोलला की, असू देत ना मग... सागर कारंडे एकच नाहीये खूप आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं, तर खूप दिसतील तुम्हाला.
या प्रकरणावर बातम्या समोर आल्या आहेत, असं म्हणता. '' जाऊ देत ना त्यांचं काम आहे, ते करतात. मरू देत ना... आपण कशाला लक्ष द्यायचं, प्रकरण खोटं आहे, माझ्यासोबत असं काही झालेलं नाही", असं उत्तर सागरने दिलं आहे.
सागरने आणखी 19 लाख रूपये व त्यावर 30 टक्के कर असे एकूण 61 लाख 83 हजार रुपये भरल्याचा दावा करण्यात आला आहे. या सायबर भामट्यांनी सागरने भरलेला 30 टक्के कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगत त्याला पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. मात्र हा प्रकार आता सागरला संशयास्पद वाटला आणि त्याच्या मनात शंकेचा पाल चुकचुकली. आपण फसवलो जातोय असं वाटल्यानंतर याप्रकरणी सागरने सायबर पोलिस ठाण्यात (उत्तर विभाग) तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं सांगितलं गेलं.