Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मला यश चोप्रांनी 1000 वेळा....', मुमताज यांनी पहिल्यांदाच केला खुलासा; ते म्हणायचे 'ए जाडे, तू...'

माझ्या मनात यश चोप्रा (Yash Chopra) यांच्यासंबंधी कोणत्याही प्रेमाच्या भावना नसल्याने नेहमी त्यांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला असं ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी सांगितलं आहे.   

'मला यश चोप्रांनी 1000 वेळा....', मुमताज यांनी पहिल्यांदाच केला खुलासा; ते म्हणायचे 'ए जाडे, तू...'

यशराज फिल्म्स बॅनरचे संस्थापक, दिग्दर्शक, निर्माते यश चोप्रा यांना मी आवडायची, पण मी नेहमी त्यांचा प्रस्ताव नाकारला असा खुलासा ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी केला आहे. यश चोप्रा सुरुवातीच्या काळात आपले भाऊ बी आर चोप्रा यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होते.  बी आर चोप्रा यांनी मुमताज यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. एका मुलाखतीत मुमताज यांनी खुलासा केला आहे की, यश चोप्रा त्यांच्या घरी येत असे आणि तिला नियमितपणे लग्नासाठी प्रस्ताव देत असे. पण आपण कधीही त्यांच्याकडे आकर्षित झालो नाही. यश चोप्रा यांचं 2012 मध्ये निधन झालं. शाहरुख खान, कतरिना आणि अनुष्का यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'जब तक है जान' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच त्यांचं निधन झालं. 

पत्रकार विकी लालवानी यांनी मुलाखतीदरम्यान मुमताज यांना यश चोप्रा यांच्याबद्दल विचारलं. यश चोप्रा यांना तुम्ही आवडत होतात हे खरं होतं का? असं विचारलं असता मुमताज यांनी सांगितलं की, "एकदा नव्हे, तर 1000 वेळा मला त्यांनी विचारलं असेल. पण मी त्यांच्या प्रेमात नव्हते. मग मी लग्न कसं काय करणार? 1000 वेळा ही थोडी अतिशयोक्ती होत आहे, पण त्यांनी मला अनेक क्षणी विचारलं, 'ए जाडे, आय लव्ह यू यार, माझ्याशी लग्न कर'. पण एखाद्यासह इतके जवळचे संबंध असण्यासाठी तुम्हाला त्याच्या प्रेमात पडावं लागेल. त्यासाठी तुमच्यात केमिस्ट्री असणं गरजेचं आहे. जर तुमच्यात ती केमिस्ट्री नसेल तर तुम्ही विवाहित जोडपं म्हणून एकत्र कसे राहणार? माझी त्यांच्यासह तशी केमिस्ट्री कधीच नव्हती".

मला ते दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून आवडत होते, पण त्यापेक्षा जास्त नाही असंही त्यांनी सांगितलं. "एक व्यक्ती म्हणून ते माझ्या आजुबाजूला असणाऱ्या सर्वोत्तम लोकांपैकी होते. ते सेटवर सर्वांना हसवत असतं. जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा मी फार रडले. मी त्यावेळी लंडनला होते. त्यांनी मला त्याच्या काही दिवस आधी फोन करुन माझा नवा चित्रपट पाहा असं सांगितलं होतं. तू पाहशील असं वचन दे असं ते म्हणाले होते. मी होकार दिला होता. पण नंतर त्यांचं निधन झालं. ते फार वाईट होतं. कारण ते फार चांगले व्यक्ती होते".

भावूक झालेल्या मुमताज यांनी पुढे सांगितलं की, "ते फार छान व्यक्ती होते. इतक्या तरुणपणात ते का गेले हे माहिती नाही. त्यांना कोणता आजार होता याची मला कल्पना नाही. मला खात्री आहे की, त्यांच्या कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले असतील. पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत. त्यांची सून राणी मला एका पार्टीत भेटली होती. ती मला सांगत होती की, यशजी यांची तुम्ही स्टुडिओला भेट द्यावी अशी इच्छा होती. तुम्ही कधी याल? मी तुम्हाला दाखवेन. त्यांची ती शेवटची इच्छा असल्याने मला तो खऱंच पाहायचा आहे. पण आता फोन करुन पाहायचा आहे सांगणं थोडं अयोग्य ठरेल".

Read More