Marathi News> मनोरंजन
Advertisement

नाना पाटेकरांना कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! मागील सात वर्षांपासून सुरु होता खटला

Nana Patekar Big Relief: मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे नाना पाटेकर या प्रकरणामुळे चर्चेत आहेत.

नाना पाटेकरांना कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! मागील सात वर्षांपासून सुरु होता खटला

Nana Patekar Big Relief: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीप्रकरणी नाना पाटेकरांना हा दिलासा मिळाला आहे. लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुरावे या प्रकरणात आढळून आले नसल्याचं सांगत दंडाधिकारी कोर्टानं तनुश्री दत्ताची तक्रार फेटाळून लावली आहे. 

कोर्टात काय युक्तीवाद झाला?

तनुश्री दत्ताने 2018 साली लैंगिक शोषणासंदर्भातील 'मी टू' मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शुक्रवारी दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्यासमोर सुनावणी झाली. वकील अनिकेत निकम यांनी नाना पाटेकरांची बाजू दंडाधिकाऱ्यांसमोर मांडली. यावेळी मुंबई पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या आरोपात सादर केलेला क्लोजर रिपोर्ट आणि पुरेशा पुराव्यांअभावी कोर्टाने पाटेकर यांच्याविरोधातील तक्रार रद्द करत असल्याचं जाहीर केलं. 

नेमकं काय घडलेलं

2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान तनुश्री आणि नाना पाटेकरांदरम्यान मोठा वाद निर्माण झालेला. या प्रकरणावरुन सेटवर गदारोळही झाला होता. या गाण्यातील एका दृश्यावर तनुश्रीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार देखील घेतली आणि ती परदेशात वास्तव्यासाठी निघून गेली. 2018 साली ती परदेशातून भारतात आली आणि तिने महिला अत्याचाराविरोधातील त्यावेळी चर्चेत असलेल्या 'मी टू'  मोहीमेअंतर्गत नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाची दखल घेऊन ओशिवरा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत.

...तर मला राग का येईल? नाना पाटेकरांचा सवाल

लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या नाना पाटेकर यांनी काही महिन्यांपूर्वी एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली होती. "मला माहीत होतं की हे आरोप चुकीचे आहेत. म्हणून मला कधीच राग आला नाही," असं नाना म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "सगळे आरोप खोटे होते, तर मला राग का येईल? आणि या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. त्या घडून गेल्या आहेत. त्याबद्दल आता आपण काय बोलू शकतो? सगळ्यांना सत्य माहीत होतं," असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले. "अचानक कोणीतरी येऊन म्हणतं की तू हे केलंस ते केलंस... मी याला काय उत्तर देऊ?" असं उलट सवाल पाटेकर यांनी मुलाखतीत विचारलेला.

Read More