Operation Sindoor Amitabh Bachchan Post: भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तानच्या सीमेजवळच्या भागांमध्ये मागील काही दिवसांपासून ड्रोन हल्ले, गोळीबार सुरु आहे. असं असतानाच आता बॉलिवूडचे बिग बी आणि सर्वात ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अमिताभ बच्चन यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय संरक्षण दलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावरुन एक खास पोस्ट करताना अमिताभ यांनी थेट उल्लेख टाळत भारतीय पंतप्रधानांबरोबरच संरक्षण दलांनी पहगाममधील मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून दिल्याची भावना व्यक्त केली आहे.
अमिताभ यांनी सोशल मीडियावर रात्री साडेतीन वाजता केलेल्या पोस्टमध्ये दहशतवाद्यांचा 'राक्षस' असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे पहलगाममधील हल्ल्याचा संदर्भ दिल्याचं दिसून येत आहे "सुट्ट्यांसाठी गेलेल्या निर्दोष पती-पत्नीला त्या राक्षसाने खेचून बाहेर काढलं. पतीला नग्न करुन त्याच्या धर्माबद्दल जाणून घेतल्यानंतर त्याला जेव्हा गोळी मारु लागला तेव्हा पत्नीने गुडघ्यांवर बसून रडत रडत तिने पतीच्या जीवाची भीक भागताना, "माझ्या नवऱ्याला मारु नका," अशी विनंती केली. मात्र त्या महिलेच्या पतीला त्या भित्र्या राक्षसाने अत्यंत अमानुषपणे गोळी मारली आणि त्याच्या पत्नीला विधवा केलं. जेव्हा पत्नीने, 'मलाही मारुन टाक' असं राक्षसाला सांगितलं तेव्हा त्याने, "नाही, तू जाऊन '.....' ला सांग," असं म्हटलं," असं अमिताभ यांनी आपल्या पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलं आहे.
पुढे अमिताभ यांनी या महिलेची अवस्था आणि मनस्थिती पाहून वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील एक ओळ आठवल्याचं म्हटलं आहे. "ती महिला '....'कडे गेली आणि म्हणाली...“है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया" (वडिलांच्या कवितेतील ओळी) त्यानंतर '.....' नी तिला सिंदूर दिला! OPERATION SINDOOR..." असं म्हणत अमिताभ यांनी भारतीय संरक्षण दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आहे.
पोस्टच्या शेवटी अमिताभ यांनी, "जय हिंद, जय हिंद की सेना, तू ना थमें गा कभी ; तू न मुड़ेगा कभी ; तू न झुकेगा कभी कर शपथ , कर शपथ, कर शपथ ! अग्नि पाथ! अग्नि पाथ ! अग्नि पाथ!!!" असं म्हटलं आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यंटकांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्यातून बाचवलेल्या मयत पर्यटकांसमोबतच्या महिलांनी दहशतवाद्यांना 'आम्हालाही मारुन टाका' असं सांगितलं असता दहशतवाद्यांनी, 'नाही, जाऊन मोदीला सांगा,' असं विधान केल्याचा दावा केला. याच पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी ही पोस्ट लिहिल्याचं दिसत असून ज्या ठिकाणी त्यांनी '.....' असं नमूद केलं आहे तिथे पंतप्रधान मोदींचं नाव अपेक्षित असल्याचं अनेकांनी पोस्टखालील कमेंट्समध्ये म्हटलं आहे. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.