Panchayat Season 4 : ‘पंचायत सीझन 3’ मध्ये रिंकी आणि सचिव जी यांच्या नात्यातली गोड सुरुवात दाखवली होती. त्यांच्या प्रेमाची सुरुवात तर झाली मात्र, त्यानंतर त्यांचं नातं आता पुढे काय आणि कसं खुलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता ‘सीझन 4’ मध्ये त्यांच्यातले काही रोमँटिक क्षणही प्रेक्षकांना पाहायला मिळाले. इतकंच काय, एक सीन तर असा होता जिथे ते एकमेकांना किस करतायत असं वाटतं, पण ऐन वेळेला ते किस करत नाहीत. आता याच गोष्टीवर रिंकी म्हणजेच अभिनेत्री सानविकानं उघडपणे मत व्यक्त केलं आहे.
सानविकानं ‘जल्ट टू फिल्मी’ या माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, 'मूळ स्क्रिप्टमध्ये सचिव जी आणि तिच्यात एक किसिंग सीन ठरलेला होता. हे ऐकल्यावर तिला तेवढं सहज वाटलं नाही. ती म्हणाली, 'दिग्दर्शक अक्षतनं मला सांगितलं की या सीझनमध्ये एक किसिंग सीन आहे, तो तुझा आणि सचिव जीचा आहे. मी त्याला म्हटलं, मला दोन दिवस वेळ दे. विचार केल्यानंतर मी ठाम नकार दिला. कारण ‘पंचायत’ ही एक कौटुंबिक सीरिज आहे. लोकांचा त्या सीनबाबत काय प्रतिसाद येईल, हे विचार करून मला ते योग्य वाटलं नाही. त्यामुळे शेवटी निर्मात्यांनी सीन बदलला.”
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो सीन पूर्णपणे काढून टाकलेला नाही. पाण्याच्या टाकीवरचा तो सीन आहे. रिंकी आणि सचिव जी एकमेकांच्या अगदी जवळ येतात, आणि जणू काही ते दोघं किस करणारच असताना, पण त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक होते. म्हणजेच काय घडलं ते प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिलं आहे. पण खरंतर आधी हा सीन वेगळा होता. दोघं कारमध्ये असतात, रिंकी पडते आणि मग त्यानंतर किस करते.
हेही वाचा : 'या' अभिनेत्रीला देशाच्या सेवेसाठी सोडावा लागला हिट शो; 11 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर करणार कमबॅक
दरम्यान, यासोबत सांविकाला त्यांच्या सीनवरून कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती या विषयी विचारण्यात आलं. तर तिनं सांगितलं की त्याविषयी काही बोलणं झालेलं नाही. तिचं म्हणणं आहे की 'त्यांच्यात या विषयी काही बोलणं झालेलं नसलं, तरी तिचं कुटुंब तिला समजून घेतं. ती आनंगी आहे की ते पंचायत सारख्या सीरिजमध्ये काम करते.'