Santosh Juvekar Clarification: छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित छावा सिनेमावर देशानं प्रेम केलं. प्रेक्षकांनी हा सिनेमा उचलून धरला आणि चित्रपटानं भारतात 526.05 कोटींची कमाई केली. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी त्यातील कलाकारांनी माध्यमांना मुलाखती दिल्या. पण यातील मराठी अभिनेता संतोष जुवेकरच्या मुलाखती चर्चेत राहिल्या. 'मी अक्षय खन्नाशी बोललो नाही' असं त्याने आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं. यावरुन त्याला सोशल मीडियात प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पण संतोष जुवेकरने पहिल्यांदाच यावर स्पष्टीकरण दिलंय. 'फोकस इंडियन' या युट्यूब चॅनलशी बोलताना संतोषनं त्यावेळी नेमकं काय घडलं? याबद्दल सांगितलं.
'माझ्यासाठी अक्षय खन्ना खूप मोठा अभिनेता आहे. मी ट्रोलमुळे बोलतोय असं नाही. पण लोकं अर्धवट ऐकतात. माझं बोलणं चुकीच्या पद्धतीने घेतली गेली. अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाची भूमिका केली. तो मुलाखत देत नाही. सोशल मीडियात नाही. पण मी मुलाखती देतो. मला आवडतं. मी स्क्रिनवर डोकावून गेलो असतो तरी मी बोलणार. छावा सिनेमात काम करणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे त्याने सांगितले. कलाकार आत्मीयतेने काम करतो की बघणाऱ्याला त्याची चीड येते. मी पुस्तक वाचलंय. मला इतिहास माहितीय. माझी भक्ती माझ्या महाराजांवर आहे. तो इम्पॅक्ट माझ्यावर आहे. माझी महाराजांवर श्रद्धा आहे. त्यामुळे मला चीड येणं स्वाभाविक असल्याचे' संतोष जुवेकरने म्हटलं. 'मला ट्रोल करणाऱ्यांनीदेखील हे केलं असतं. याने अक्षय खन्ना वाईट आहे, असं अर्थ होत नाही. आमचे सहकारी जतिन यांनी अक्षय सरांना भेटणार का? असं विचारलं. तेव्हा मला नाही भेटायचं हे माझं बोलण होतं. त्यात उद्धटपणा नव्हता. त्याचा मेकअप, त्याने केलेले काम हे पाहून...माझ्यातल्या कलाकारावर संतोष जुवेकर हावी झाला. मला आणखीजण ट्रोल करतील पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही.अक्षय खन्नाचा मेकअप, बॉडी लॅंग्वेज पाहून चीड येणार. त्यावेळी माझी प्रामाणिक प्रतिक्रिया मी व्यक्त केल्याचे' अभिनेता संतोष जुवेकरने 'फोकस इंडियन' शी बोलताना सांगितलं. शेवटच्या सीनमध्ये संभाजी महाराज रायाजींकडे पाहतात. तो क्षण माझ्यासाठी अद्वितीय होता. माझ्या अंगात रायाची आले. तिथे असलेल्या प्रत्येकाच्या अंगात ते ते कॅरेक्टर आलं. ही किमया दिग्दर्शकाची असल्याचे संतोष जुवेकरने म्हटले.
'लेझीम आपला पारंपारिक खेळ आहे. बुराणपूरची लढाई जिंकल्यानंतर महाराज रायगडावर येतात. आणि संपूर्ण जनता आनंद साजरा करते. शिवरायांच्या जाण्याचं दु:ख होतं. पण संभाजी महाराज जनतेच्या सुखदुखात आपले सुखदुख मानणारे होते. त्यामुळे त्यांनी मावळ्यांच्या लेझीम खेळण्याच्या विनंतीला मान दिला असेल, असे संतोष जुवेकरने म्हटले. मी मराठी माध्यमांचे आभार मानतो. त्यांनी मित्र म्हणून मला मदत केली.