लग्न म्हणजे प्रत्येकासाठी आयुष्याची नवी सुरुवात असते. लग्नानंतर आपल्या जोडीदाराच्या साथीने अनेक स्वप्नं पूर्ण करण्याची आशा तरुणांच्या मनात असते. पण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरुणासाठी मात्र हे स्वप्नच राहिलं. आपल्या लग्नाची पहिली रात्र तो संपूर्ण आयुष्यभर विसरु शकणार नाही. कारण नववधूने पहिल्याच रात्री फसवणूक करुन पळ काढला आहे. नवरामुलगा लग्नाच्या रात्री रुममध्ये सजलेल्या बेडवर वाट पाहत असताना, नवरीमुलगी सगळं सामान घेऊन पळून गेली.
हा सगळा एका कटाचा भाग होता असं समोर आलं आहे. या कटानुसार तरुणी नवरीमुलगी होऊन घरी आली होती. संपूर्ण लग्नाचं नियोजन, नवरीमुलीची एंट्री एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशीच होती. पण यामागे नवऱ्यामुलाच्या घरातील पैसे, दागिने लुटणे हा एकमेव हेतू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नासाठी मुलाच्या कुटुंबीयांकडून 1.20 लाख रुपये मागितले होते. है पेसे मिळाल्यानंतर ठरलेल्या तारखेला लग्न पार पडलं. लग्नानंतर सर्व काही सर्वसामान्य वाटत होतं. सर्व विधी व्यवस्थित पार पडले, नातेवाईकांचे आशीर्वाद घेण्यात आले. पण कुटुंबीयांना घरात नातं जोडण्याच्या नावाखाली आलेली ही मुलगी आपला पैसा, दागिने लुटून नेणार असल्याची कोणालाही कल्पना नव्हती.
रिपोर्टनुसार, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रात्री नवरीमुलीने कुटुंबीयांच्या दुधात बेशुद्ध करण्यासाठी औषध मिसळलं. हे दूध तिने सासू आणि पतीला पिण्यास दिलं. दूध प्यायलयाने सासू बेशुद्ध पडली तर दुसरीकडे नवरामुलगा रुममध्ये बसला होता. रात्रीच्या अंधारात सर्व काही शांत असताना नवरीमुलगी घऱाबाहेर पडली आणि बाईकवर वाट पाहणाऱ्याच्या बाईकवर बसून फरार झाली. सकाळी नवरामुलगा आणि त्याच्या आईला जाग आली तेव्हा घरातील पैसे, दागिने गायब झाल्याचं लक्षात आलं.
घर तपासलं असता जवळपास 1.30 लाख रोख रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने गायब असल्याचं लक्षात आलं. साखरपुड्याच्या अंगठीपासून ते चांदीची पैजण, साखळी काहीच शिल्लक ठेवलं नाही. यामुळे जिथे लग्नाची लगबग होती तिथे शांतता पसरली.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कुटुंबीयांनी पोलिसांना कळलं. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासलं असता त्यात ती एका बाईकवरुन जाताना दिसली. बाईकचा नंबरही सीसीटीव्हीत कैद झाला आहे, ज्याच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे.
सर्वाच आश्चर्याची बाब म्हणजे, लग्नाच्या वेळी देण्यात आलेलं आधार कार्डही बनावट निघालं आहे. इतकंच नाही तर लग्नात तिच्या बाजूने आलेले नातेवाईकही खोटे होते. संपूर्ण कट अशा पद्धतीने रचण्यात आला होता की, मुलाच्या कुटुंबीयांना शंकाही आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरु आहे.