एअर इंडिया विमान अपघाताने कित्येक कुटुंबं संपूर्णतः उध्वस्त झाली आहेत. त्यात लंडनहून ईद साजरी करण्यासाठी आणि आपल्या अम्मी अर्थात आईला भेटायला आलेला जावेद अली आणि त्याचं संपूर्ण कुटुंब होते. पण या दुर्दैवी विमान अपघातात मृत्युमुखी पडलं. तब्बल 15 वर्षांनी तो संपूर्ण कुटुंबासह ईदसाठी मायदेशी आला होता. पण नियतीने वेगळंच काही ठरवलेलं होतं.
37 वर्षीय जावेद, त्याची पत्नी मरियम, पाच वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची चिमुकली मुलगी हे चौघंही एकत्र होते. ते चौघेही एअर इंडिया फ्लाइट AI-171 ने 242 लोकांसोबत अहमदाबादमधून लंडनला जाण्यासाठी निघाले होते. गुरुवारी ही फ्लाइट टेकऑफनंतर काही क्षणांतच इमारतीवर आदळून कोसळली आणि त्या अपघातात हे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडलं.
जावेदच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याचा इतिहास असून लवकरच तिची शस्त्रक्रिया होणार होती. तिच्या प्रकृतीचा विचार करून तिला अद्यापही हे सांगण्यात आलेलं नाही की, तिनं फक्त मुलगाच नव्हे तर सुना आणि दोन्ही नातवंडंही गमावली आहेत.
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पीडितांच्या DNA चाचण्या सुरू असताना जावेदचा भाऊ इम्तियाज यांनी NDTV शी बोलताना सांगितलं, “आमचं संपूर्ण कुटुंब संपलं. हे कोणत्या दु:स्वप्नासारखं वाटतंय. जावेद 11 वर्षांपूर्वी शिक्षणासाठी युकेला गेला होता. तिथेच त्याची ओळख मरियमशी झाली आणि ते लग्न करून लंडनमध्ये स्थायिक झाले. ते ब्रिटिश नागरिक झाले होते."
इम्तियाज पुढे म्हणाले की, “आम्ही चार भाऊ-बहिणं आहोत. गेल्या 15 वर्षांत कधी दोन, कधी तिघं भेटत असतं. पण यावेळी पहिल्यांदा सगळे एकत्र आलो होतो. आईच्या ऑपरेशनपूर्वी ती आनंदी राहावी म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. जावेद खूप आनंदात होता. पण नियतीने आमच्या सर्वांच्या आनंदावर काळाचा पडदा टाकला.”
“आम्ही आमच्या कुटुंबातील चार जीव गमावले. कोण जबाबदार आहे याला? 240 हून अधिक लोकं गेली. असं पुन्हा पुन्हा होत राहणार का? विमान फक्त उड्डाण करतं आणि काही सेकंदांतच कोसळतं, हे कसं शक्य आहे?” असं म्हणत इम्तियाज यांनी दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.