India-Pak War: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या तणावपूर्ण नात्यात आणखी दुरावा आल्याचं पाहायला मिळालं. भारताच्या नंदनवनात घडवून आणलेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारनं धोरणात्मक आणि आता लष्करी पद्धतीनं शेजारी राष्ट्राच्या कुरघोड्यांना उत्तर देण्याची भूमिका स्वीकारली आहे.
एकिकडून धोरणात्मक तत्त्वांनी पाकची कोंडी करत असतानाच दुसरीकडे देशाच्या सीमानाभागात वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघनही भारतानं परतवून लागवल्याचं पाहायला मिळत आहे. पीओकेमध्ये 42हून अधिक दहशतवादी तळ सक्रीय असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर आता कारवाईबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. उच्चस्तरीय पातळीवर याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचं समजतंय. (PM Modi) पंतप्रधान मोदींनीही दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार असल्याचं सांगत कठोर कारवाईचा इशारा दिलाय. त्यामुळे या भागात लवकरच लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
सीमेपलिकडून अर्थात पाकिस्तानच्या दिशेनं सीमाभागात लष्करी कारवायांमध्ये वाढ होत असताना आणि शेजारी राष्ट्रानं मोठ्या प्रमाणात नियंत्रण रेषेनजीक फौजफाटा आणलेला असतानाच भारतीय सैन्यातील तिन्ही तुकड्यांनासुद्धा सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रामुख्यानं वायुदलाला केंद्राकडून कोणत्याही परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना करत आदेश येताच पुढच्या दोन मिनिटांत सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत. भारत- पाक युद्धाचे संभाव्य ढग घोंगावत असतानाच सावधगिरी म्हणून भारत सरकारनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं पुढील काही दिवसांच भारतीय लष्कराकडून पाकसोबतच्या या तणावात काहीतरी मोठं घडण्याचे संकेत मिळत आहेत.
इथं भारताकडूनही कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज केल्या जात असतानाच तिथं पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पाक सैन्यानंही सीमा भागात अधिक फौजफाटा आणि तोफा तैनात केल्या आहेत. तर, सीमाभागात एअरस्ट्राईकचा धोका असल्यामुळं पाकनं काही ठिकाणी असणारे लाँच पॅडही रिकामे केल्याचं म्हटलं जात आहे.
भारताच्या पुंछ आणि काश्मीरच्या इतर भागांमध्ये पाकिस्तानकडून अधूनमधून गोळीबार सुरूच असून पाकच्या बाजूनं सीमाभागांत असणाकी गावं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असून, डोंगराळ वनक्षेत्रातून भारतात पुन्हा एकदा दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तान कटकारस्थानं रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे.