Ahmedabad Air India Plane Crash 70 Tola Gold : 12 जून 2025 रोजी भारतात एक मोठी विमान दुर्घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमान उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आता घटनस्थळावरुन मृत व्यक्तींच्या वस्तू गोळा केल्या जात आहेत. घटनास्थळावरुन 70 तोळा सोनं हस्तगत करण्यात आले आहे. घटनास्थळी तातडीने मदतकार्य करणाऱ्या राजू पटेल यांनी मृतांचे दागिने तसेच मौल्यवान दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले.
अहमदाबादमधून लंडनकडे जाणारं एअर इंडियाचं बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान दुर्घटनाग्रस्त झाले. अहमदाबादमधून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचं विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर जाऊन कोसळलं. यानंतर मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट उसळले. या भयानक अपघाताचे वृत्त जगभरात पसरले. बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी दाखल झालेल्या पथकासह राजू पटेल नावाचे स्थानिक व्यावसायिक आपल्या टीमसह मदत कार्यात सहभागी झाले. राजू पटेल हे अपघातस्थळापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर होते. अपघाताची बातमी मिळताच त्यांनी तातडीने त्यांच्या टीमसह अपघातस्थळी धाव घेतली. ते अवघ्या पाच मिनिटांत तिथे पोहोचले. पहिले 15 ते 20 मिनिटे आम्ही ढिगाऱ्याजवळही जाऊ शकलो नाही. आग खूप भयानक होती. पहिल्यांदा अग्निशमन दल आणि 108 रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली. यानंतर आम्ही बचाव कार्यात उडी घेतली असे पटेल म्हणाले.
बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी पटेल आणि त्यांच्या टीमला रात्री 9 वाजेपर्यंत घटनास्थळी राहण्याची परवानगी दिली. आपत्कालीन सेवांनी ताबा मिळवल्यानंतर पटेल यांच्या टीमने ढिगाऱ्यातून बाहेर पडण्यास सुरुवात केली. घटनास्थळी पटेल आणि त्यांच्या टीमला 70 तोळे सोन्याचे दागिने, 80,000 रुपये रोख, अनेक पासपोर्ट, जळालेली भगवद्गीता तसेच अनेक मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत. घटनास्थळी सापडलेल्या सर्व वस्तू गोळा करुन पटेल आणि त्यांच्या टीमने या वस्तू तातडीने पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत. सोशल मीडियावर सामान्य लोक राजू पटेल आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे. अनेकदा अपघात झाल्यावर किंवा कोणती घटना घडल्यावर मृतदेहांचे दागिने तसेच वस्तूंवर अनेकजण डल्ला मारतात. मात्र, पटेल आणि त्यांच्या टीमने फक्त अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे सिद्ध करुन दाखवले आहे.