Ahmedabad Plane Crash: 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. आता पहिल्यांदाच सरकारने या घटनेची स्पष्ट माहिती दिली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचा बळी ठरलेले विमान टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच अडचणीत सापडले. फ्लाइट एआय-171 फक्त 650 फूट उंचीवर जाऊ शकले आणि नंतर वेगाने खाली पडू लागले. पायलटने आपत्कालीन कॉल केला पण खूप कमी वेळ होता. अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
शनिवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अहमदाबाद विमान अपघाताबाबत पहिली अधिकृत पत्रकार परिषद घेतली. एअर इंडियाचे विमान एआय-171 ने दुपारी 1.38 वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले. टेकऑफ केल्यानंतर एका मिनिटातच, फ्लाइट फक्त 650 फूट उंचीवर पोहोचू शकले आणि नंतर अचानक खाली पडू लागले. वैमानिकाने दुपारी 1.39 वाजता नियंत्रण टॉवरला 'मे डे' कॉल पाठवला होता, अशी माहिती मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांनी दिली.
वैमानिकाने दुपारी 1.39 वाजता नियंत्रण टॉवरला 'मे डे' कॉल पाठवला. जो आपत्कालीन परिस्थितीचा सर्वात गंभीर इशारा आहे. पण अवघ्या एका मिनिटानंतर विमान शहरातील मेघानीनगर परिसरातील वैद्यकीय वसतिगृहाच्या इमारतींवर कोसळले. या अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी फक्त एकच व्यक्ती वाचली. याशिवाय जमिनीवर उपस्थित असलेल्या 20 हून अधिक लोकांचाही मृत्यू झाला.
हे विमान पॅरिसहून दिल्लीमार्गे अहमदाबादला पोहोचले होते आणि वाटेत कोणत्याही तांत्रिक समस्येची माहिती नव्हती. अपघातानंतर लगेचच मदत आणि बचाव कार्य सुरू झाले पण आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वेळ लागला. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती 3 महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.
या अपघातानंतर डीजीसीएने एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांची चौकशी सुरू केली आहे. देशात अशी 34 विमाने आहेत, त्यापैकी 8 विमानांची चौकशी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. जो चौकशीसाठी पाठवण्यात आलाय.