DNA Testing: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात दगावलेल्या प्रवाशांचे मृतदेह ओळखण्यासाठी आता डीएनए चाचणीचा वापर केला जातोय. आतापर्यंत या अपघातात 274 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालाय. विमानात किती लोक होते आणि त्यांची नावे काय होती याची माहिती अधिकाऱ्यांकडे आहे. पण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत आहेत की ओळख पटवण्याच्या पलिकडे आहे. त्यामुळे सामान्य पद्धतींद्वारे ते शोधणे कठीण आहे. म्हणूनच अधिकाऱ्यांनी आता मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतलाय.
सोप्या शब्दांत सांगायचे तर कोणत्याही जीवाच्या शरीरातील सर्वात लहान एकक म्हणजे डीएनए. हा डीएनए रक्ताच्या थेंबापासून ते केसांच्या तुकड्यापर्यंत, त्वचेचा तुकडा आणि हाडांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये आढळतो. डीएनएला कोणत्याही जीवाची जैविक ओळख म्हणून पाहिले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाची अनुवांशिक माहिती त्याच्या डीएनएमध्ये लपलेली असते.
अनुवांशिक माहितीसोबतच डीएनएचा वापर एखाद्या व्यक्तीचे जैविक वय, लिंग इत्यादी शोधण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा डीएनए त्याच्या आई आणि वडिलांकडून मिळालेल्या डीएनए गुणांपासून तयार होतो. यामुळे त्याचा डीएनए त्याच्या पालकांशी सुमारे 50-50 टक्के जुळतो. त्याचप्रमाणे त्याचा डीएनए त्याच्या मुलाशी सुमारे 50 टक्के जुळतो. भावंडांच्या बाबतीत डीएनए 35 ते 65 टक्के किंवा त्याहूनही जास्त जुळू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे भावंडांचा त्यांच्या पालकांकडून समान डीएनए असू शकतो किंवा त्यांना त्यांच्या पालकांकडून पूर्णपणे भिन्न डीएनए गुण मिळाले असतील.
मृत व्यक्तीच्या डीएनएची ओळख पटविण्यासाठी फॉरेन्सिक लॅब त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे नमुने घेतील. यात त्यांची भावंड, मुले किंवा पालक यांचा समावेश असतो. गालांच्या आतून रक्त, केस किंवा त्वचेचे स्वॅब डीएनए चाचणीसाठी नमुने म्हणून घेतले जाऊ शकतात. यानंतर हे डीएनए नमुने मृत व्यक्तीच्या नमुन्यांशी जुळवले जातील. नमुने जुळल्याने ते एकाच कुटुंबातील सदस्य आहेत असे दिसून येईल. यानंतर मृतदेह ज्यांच्याशी डीएनए जुळतो त्यांना सोपवला जाईल.
भारत हा जगातील अशा पहिल्या देशांपैकी एक आहे जिथे न्यायालयात डीएनए पुरावे स्वीकारले गेले. गेल्यावर्षी केरळमधील वायनाड येथे भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटविण्यासाठी डीएनए फिंगरप्रिंटिंगचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे जून 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरानंतर मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए फिंगरप्रिंटिंगचा वापर करण्यात आला होता.
गुजरातच्या एटीएसने अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमानाच्या मलब्यातून डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (डीव्हीआर) मिळवला आहे. एटीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, "हा डीव्हीआर आम्ही मलब्यातू मिळवला आहे. एफएसएल टीम लवकरच येथे येईल". डीव्हीआर म्हणजे डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर असतो. याचं काम विमानाच्या हालचालींची नोंद ठेवणं असतं. हे डिव्हाईस केबिन, कॉकपिट आणि बाहेरील भागांचं रेकॉर्डिंग करतं. यामध्ये विमान प्रवासादरम्यान होणाऱ्या घडामोडींचा व्हिडीओ डेटा असतो.या डेटाच्या माध्यमातून विमानात बसलेले प्रवासी आणि क्रू मेम्बर्स यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाऊ शकतं आणि नंतर पाहिलं जाऊ शकतं. अनेकजण हाच ब्लॅक बॉक्स असल्याचं समजत आहेत. पण याला ब्लॅक बॉक्स म्हणू शकत नाही. पण हा ब्लॅक बॉक्सची मदत करतो. दोन असे डिव्हाईस असतात ज्यांनी ब्लॅक बॉक्स नाव दिलं जातं. या दोन डिव्हाईसमध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट वॉइस रेकॉर्डर (CVR) असतात. जेव्हा त्यात डीव्हीआर सामील होतो तेव्हा तो यामध्ये डेटा व्हिडीओ देण्याचं काम करतो.