Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला. या विमान दुर्घटनेचे दु:ख आजही भारतीयांच्या मनावर आहे. तसेच दुर्घटनेमागची कारणेदेखील शोधली जात आहेत. या दुर्घटनेसंदर्भातील एक भावनिक कहाणी समोर आलीय. जी ऐकून तुमच्या डोळ्यात अश्रू येतील.
एअर इंडिया विमान अपघातात 8 महिन्यांचा ध्यांश वाचला. ध्यांशला त्याच्या आईने आगीपासून वाचवले आणि त्याच्या गंभीर जखमांवर उपचार करण्यासाठी स्वतःच्या त्वचेचे दानही केले. डॉक्टरांच्या मते, 36% भाजलेला हा लहान मुलगा आता बरा होतोय. कारण त्याच्या आईच्या त्वचेचा उपयोग त्याच्या जखमांना बरे करण्यासाठी उपयुक्त ठरलाय. ध्यांशची आई मनीषा देखील या दुर्घटनेत 25% जळाली होती.
स्किन ट्रान्सप्लांटमध्ये जखम, जळलेली त्वचा, शस्त्रक्रिया किंवा रोगामुळे खराब झालेल्या भागावर निरोगी त्वचा प्रत्यारोपित केली जाते. यामुळे ऊतकांची वाढ होण्यास मदत होते आणि रुग्णाला बरे होण्यास सहाय्य मिळते.
डॉक्टरांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, 5 आठवड्यांच्या गहन उपचारानंतर आणि आगीमुळे खराब झालेल्या त्वचेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. ध्यांश आणि त्याच्या आईला अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. के. डी. रुग्णालयातील ‘कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन’ डॉ. रुत्विज पारिख यांनी सांगितले की, ध्यांशच्या त्वचेसह त्याच्या आईच्या त्वचेचा उपयोग त्याच्या ‘थर्ड-डिग्री बर्न’ जखमांवर उपचार करण्यासाठी करण्यात आला.
12 जून रोजी एअर इंडिया फ्लाइट क्रमांक 171 बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल परिसरात कोसळले. त्या वेळी मनीषा कछाडिया आणि त्यांचा मुलगा ध्यांश दुर्घटनेने बाधित झालेल्या इमारतींपैकी एकामध्ये होते. ध्यांशचे वडील कपिल कछाडिया हे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये युरोलॉजीमध्ये सुपर-स्पेशालिटी एमसीएच डिग्री कोर्स करत आहेत आणि ते सिव्हिल हॉस्पिटलशी संलग्न आहेत. दुर्घटनेच्या वेळी कपिल रुग्णालयात होते, तर त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांना वाटप केलेल्या निवासस्थानात होते. या भयंकर दुर्घटनेत मनीषा आणि ध्यांश दोघेही जळाले. या विमान अपघातात 260 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात विमानातील 241 प्रवासी आणि जमिनीवरील काही इतर लोकांचा समावेश होता.
ही दुर्घटना आणि त्यानंतर लागलेली आग इतकी भीषण होती की, फ्लॅटच्या आत असूनही उष्णतेमुळे होमिओपॅथी डॉक्टर मनीषा आणि ध्यांश जळाले, अशी माहिती कपिल कछाडिया यांनी दिली. दुर्घटना झाली तेव्हा मनीषाला जखम झाल्या होत्या, पण तरीही तिने आपल्या मुलाला उचलले आणि इमारतीतून बाहेर पडण्यात यश मिळवल्याचे ते म्हणाले. या हृदयस्पर्शी कहाणीत मनीषाने आपल्या मुलासाठी दाखवलेले धैर्य आणि त्याग यामुळे ध्यांशला नवे जीवन मिळाले.