Ayodhya Couple Death: अयोध्येत मधुचंद्राच्या रात्री शिवानी आणि प्रदीप यांचे मृतदेह आढळल्यानंतर हे प्रकरण आणखी रहस्यमय होताना दिसत आहे. एकीकडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मोबाईल कॉल डिटेल्समुळे अनेक संशय निर्माण झाले होते. त्यात कुटुंबातील सदस्यांनी शांतता ठेवल्याने प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं आहे. रात्री 12 वाजता झोपण्यासाठी गेलेल्या या नवविवाहित जोडप्याचं फक्त तीन तासात आयुष्य संपवलं. पोलीस या उत्तराचा शोध घेत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रदीपने सर्वात शेवटी आपल्या नातेवाईकाला फोन केला होता. यावेळी त्यांच्यात काही खास बोलणं झालं नव्हतं. पोलिसांनी नातेवाईकाकडे चौकशी केली असता, प्रदीपने मोबाईल फोन खरेदी करण्यासंदर्भात विचारलं होतं असं सांगितलं. मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, पोलिसांना प्रदीपच्या फोनमध्ये अर्धवट टाइप केलेला मेसेजही सापडला आहे, ज्यामध्ये शिवानीचं नाव लिहिलं होतं. त्याला काही सांगायचं होतं की हा फक्त एक योगायोग होता? याबद्दल काही माहिती समोर आलेली नाही.
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, शिवानीचा मृत्यू रात्री 3 वाजता गळा दाबल्यामुळे झाला. म्हणजेच रात्री 12 वाजता झोपण्यासाठी गेलेल्या या जोडप्यात तीन तासात असं काही झालं ज्यामुळे प्रदीपने शिवानीचा जीव घेतला. शिवानीची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्रदीपने आत्महत्या केली. दरम्यान यामध्ये अजून तिसरं कोणी सहभागी होतं का याची पोलीस पडताळणी करत आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दरवाजा आतून बंद होता. अशात तिसऱ्या व्यक्तीचा सहभागी असण्याची शक्यता फार कमी आहे. एसएसपींनी सांगितलं की, पोलीस पोहोचले तेव्हा दरवाजा आधीच तोडलेला होता. कारण सकाळी दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला होता.यानंतर आतील दृश्य पाहून ते सगळे चक्रावले होते. फॉरेन्सिक टीम पोहोचल्यानंतर लटकणाऱ्या अवस्थेत असणाऱ्या प्रदीपचा मृतदेह खाली उतरवण्यात आला.
अयोध्याचे एसएसपी राज करन नैय्यरने यांनी सांगितलं की, शिवानी आणि प्रदीपच्या आई-वडिलांशी वेगवेगळी चौकशी करण्यात आली. पण कुटुंबीयांच्या जबाबातून असं काहीच समोर आलेलं नाही ज्यावरुन संशय निर्माण होईल आणि त्याच्या आधारे तपास पुढे नेता येईल. पोलिसांना याप्रकरणी तक्रारही मिळालेली नाही.
प्रदीप आणि शिवानी यांचं 7 मार्चला लग्न झालं होतं. शनिवारी नवरीमुलगी वरात घेऊन घरी पोहोचली होती. तर रविवारी रिसेप्शन होणार होतं. रिसेप्शनसाठी तयारी सुरु होती असं प्रदीपच्या भावाने सांगितलं आहे. मी कुटुंबातील इतर सदस्य आणि नातेवाईकांसह रिसेप्शनसाठी भाज्या खरेदी करण्यास गेलो होतो. भाजी खरेदी करत असतानाच मला घरुन फोन आला. घरी पोहोचल्यानंतर पाहिलं तर सगळे रडत होते. दोघांचा मृत्यू नेमक्या कोणत्या स्थितीत झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.