Marathi News> भारत
Advertisement

बंगळुरुतील टेक कंपनीचा 6 महिन्यातच पुण्यात परतण्याचा निर्णय; संस्थापक म्हणाले 'मूर्खाप्रमाणे भाषा...', पोस्ट व्हायरल

बंगळुरुमधील एका तंत्रज्ञान कंपनीने आपलं कार्यालय बंद करुन, पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संस्थापकाने भाषेवरुन सुरु असलेला वाद यासाठी कारणीभूत असल्याचं स्पष्ट केलं आहे.   

बंगळुरुतील टेक कंपनीचा 6 महिन्यातच पुण्यात परतण्याचा निर्णय; संस्थापक म्हणाले 'मूर्खाप्रमाणे भाषा...', पोस्ट व्हायरल

बंगळुरुस्थित तंत्रज्ञान कंपनीच्या संस्थापकाने आपलं कंपनीचं ऑफिस पुण्याचा हलवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त सहा महिन्यातच कंपनीने बंगळुरुमधील कार्यालय बंद करण्याचं ठरवलं आहे. भाषेवरुन सुरु असलेला मूर्खपणा यासाठी कारणीभूत असल्याचं संस्थापकाने पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

"जर भाषेचा हा मूर्खपणा असाच सुरु राहिला तर मला माझे गैर-कन्नड भाषिक कर्मचारी पुढील 'बळी' ठरावेत अशी इच्छा नाही," असं उद्योजक कौशिक मुखर्जी यांनी एक्सवर लिहिलं आहे. माझअया कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, आपण त्यांच्याशी [दृष्टिकोनाशी] सहमत आहेत", असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

बंगळुरुच्या चांदापुरा भागातील एसबीआय शाखेत घडलेल्या एका प्रकारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेतील एका मॅनेजरने एका ग्राहकाशी कन्नडमध्ये बोलण्यास नकार दिला आणि म्हटलं, "हा भारत आहे, मी कन्नड नाही तर हिंदी बोलेन". हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर कन्नड कार्यकर्त्यांकडून आणि राजकीय नेत्यांकडूनही त्यावर तीव्र टीका झाली.

बंगळुरुमधील खासदार तेजस्वी सूर्या यांनी हा व्हिडीओ शेअऱ करत हे वागणं स्विकारलं जाऊ शकत नाही असं मह्टलं होतं. या पोस्टला उत्तर देताना कौशिक मुखर्जी यांनी ऑफिस पुण्याला नेत असल्याचं जाहीर केलं आहे. 

"जर तुम्ही कर्नाटकात ग्राहक सेवेचं काम करत असाल, विशेषतः बँकिंगसारख्या क्षेत्रात, तर ग्राहकांना त्यांच्या भाषेत संवाद साधणे महत्वाचे आहे," असं सूर्या यांनी म्हटलं. कर्नाटकातील बँका आणि इतर सार्वजनिक संस्थांनी स्थानिक भाषा बोलणारे कर्मचारी नियुक्त करावेत अशी त्यांची दीर्घकाळची मागणी त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मांडली. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही एसबीआयमधील घटनेवर टीका केली होती. तसंच  मॅनजेरचं वर्तन निषेधार्ह असल्याचे म्हटलं. त्यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाला देशभरातील बँकिंग कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक आणि भाषा संवेदनशीलता प्रशिक्षण लागू करण्याची विनंती केली. दरम्यान या घटेननंतर मॅनेजरची बदली करण्यात आली आहे. बँक आणि मॅनेजीर दोघांनीही माफी मागितली आहे.

Read More