केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये पंचकुला येथील दहावीची विद्यार्थिनी सृष्टी शर्मा हिने 2025 च्या CBSE दहावीच्या बोर्ड परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे तिनेही कोणतीही शिकवणी न लावता हे यश मिळवलं आहे.
"मी फार आनंदी आहे. मी माझं कुटुंब आणि शिक्षकांची छाती अभिमानाने उंचावली आहे. मी कोणतीही शिकवणी लावली नाही. मी दिवसातून 20 तास अभ्यास करायचे. माझ्यात फार आत्मविश्वास नव्हता, पण माझ्या पालकांनी नेहमीच मला पाठिंबा दिला. माझे वडील माझी सर्वात मोठी प्रेरणा आहेत. त्यांनी नेहमी माझ्यावर विश्वास दाखवला," असं सृष्टी शर्माने सांगितलं आहे.
तिचे वडील सिटकोमध्ये कर्मचारी आहेत. वडील सृष्टीसाठी सर्वात मोठा आधार आहेत. सृष्टी तिच्या यशाचे श्रेय स्व-अभ्यासाला देते. एनसीईआरटीची पाठ्यपुस्तकं ती पूर्णपणे वाचते. तिने सांगितलं की तिने एनसीईआरटीच्या पुस्तकांमधील एकही शब्द सोडला नाही. सृष्टीला अभियंता बनण्याची इच्छा आहे आणि ती आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहत आहे.
या वर्षी 2,371,939 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ज्यामधील 2,221,636 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 93.66 टक्के आहे. 2024 च्या तुलनेत हे 0.06 टक्क्यांची वाढ झाली आहे.
यशस्वी उमेदवारांपैकी 1.99 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, तर 45 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान संपूर्ण भारत आणि निवडक आंतरराष्ट्रीय केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या.
तथापि, 1.41 लाख विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. त्रिवेंद्रम 99.79 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर विजयवाडा, बंगळुरू, चेन्नई आणि पुणे यांचा क्रमांक लागतो. गुवाहाटीने सर्वात कमी 84.14 टक्के उत्तीर्णतेची नोंद केली.