केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र कर्मचारी आता वैयक्तिक कारणासह आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी 30 दिवसांची सुट्टी घेऊ शकतात. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. सेवा नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा मिळण्याचा अधिकार आहे, जी वृद्ध पालकांची काळजी घेण्यासारख्या वैयक्तिक कारणांसाठी वापरली जाऊ शकते.
सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी रजा घेण्याची काही तरतूद आहे का? असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली.
“केंद्रीय नागरी सेवा (रजा) नियम, 1972 मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना इतर पात्र रजांव्यतिरिक्त दरवर्षी 30 दिवसांची पगारी रजा, 20 दिवसांची अर्धपगारी रजा, आठ दिवसांची कॅज्युअल रजा आणि दोन दिवसांची मर्यादित रजा देण्याची तरतूद आहे, जी वृद्ध पालकांची काळजी घेण्यासह कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी मिळू शकते,” असं सिंह यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे.
केंद्रीय नागरी सेवा (रजा) नियम, 1972 1 जून 1972 पासून लागू झाला. हे वैधानिक नियम सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना रजा देण्यासंदर्भातील नियम करतात. पण यातून इतर नियमांतर्गत येणाऱ्यांना वगगळलं जातं. ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवा सदस्यांचा समावेश आहे.
सेवा नियमांनुसार, वेगवेगळ्या प्रकारच्या रजा आहेत ज्यामध्ये पगारी रजा, अर्ध्या दिवसाची रजा, बदललेली रजा, थकीत रजा, असाधारण रजा, प्रसूती रजा, पितृत्व रजा, बालसंगोपन रजा, अभ्यास रजा, विशेष अपंगत्व रजा, रुग्णालय रजा आणि विभागीय रजा अशा विविध प्रकारच्या रजा आहेत.
सरकारी धोरणानुसार, रजा सरकारी कर्मचाऱ्याच्या "रजा खात्यात" वर्षातून दोनदा, अनुक्रमे 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी रजा जमा केली जाते. कर्मचाऱ्यांनी रजा घेतल्यावर ती वजा केली जाते. तथापि, काही "विशेष प्रकारच्या रजा" रजा खात्यात वजा केल्या जात नाहीत.
वेळोवेळी सरकारने जारी केलेल्या कार्यकारी सूचना कॅज्युअल रजा, मर्यादित रजा, भरपाईची सुट्टी आणि विशेष कॅज्युअल रजा यासारख्या सुट्ट्यांचे नियमन करतात.