Chhava Effect Treasure Hunt At Night: सध्या तिकीटबारीवर बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला 'छवा' चित्रपट दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. मात्र या चित्रपटाचा वेगळाच परिणाम सध्या औरंगजेबाची 'तिजोरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुरहानपूरमध्ये दिसून येत आहे. 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशमधील बुरहानपूर येथील असीरगढ किल्ल्याजवळील ग्रामस्थांनी सोन्याचा शोध सुरु केला आहे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मुघल काळातील सोन्याच्या शोधात अनेकांनी शेतात खोदकाम सुरू केले. अनेकजण रात्रभर या ठिकाणी खोदकाम करताना दिसून आले.
मुघलांनी मराठ्यांकडून सोने आणि खजिना लुटला आणि तो मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथील असीरगड किल्ल्यात ठेवल्याचा संदर्भ 'छावा' चित्रपटात आहे. त्यामुळेच या ठिकाणी शेतांमध्ये डोक्यावर टॉर्च असलेल्या टोप्या, जमिनीत खोदणारा जमाव आणि चाळणीतून माती चाळणाऱ्या महिला, असं चित्र बुरहानपूरमध्ये दिसत आहे. प्रथमदर्शनी रात्रीच्या अंधारात हे चित्र पाहिल्यानंतर इथं नेमकं चाललंय तरी काय? हे लोक काय शोधत आहेत? असा प्रश्न कोणालाही पडेल. या प्रश्नाचं उत्तर मात्र फारच मैल्यवान आणि खास आहे. हे लोक या ठिकाणी सोन्याची नाणी शोधत आहेत.
सोन्याच्या शोधात रात्री बुरहानपूरच्या असीरगड गावात लोकांची झुंबड पाहायला मिळत आहे. इथं सोन्याची नाणी सापडतात यासाठी 'छावा' चित्रपटाबरोबरच अजून एक गोष्ट कारणीभूत ठरली. खरं तर इथे असीरगडमध्ये सध्या महामार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी येथील शेतात काम करणाऱ्या काही मजुरांनी मातीत सोन्याची नाणी सापडल्याचा दावा केला होता. ही बातमी पंचक्रोषीमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर येथे सोन्याची नाणी पुरण्यात आल्याची अफवा पसरली. त्यानंतर या गोष्टीची सत्यता पडताळून न पाहता आजूबाजूच्या 50 हून अधिक गावांतील लोकांनी या शेतात धाड टाकली. आता रोज रात्र होताच सोन्याच्या शोधात लोकांची झुंबड इथे पोहोचते. मग अनेक तास खोदकाम, माती चाळणे असे उद्योग सुरु असतात. तुम्हीच पाहा व्हायरल झालेला हा व्हिडीओ....
फिल्म छावा देखने के बाद, (मध्य प्रदेश) के असीरगढ़ किले के पास के गांव के लोग सोने की खोज कर रहे हैं... pic.twitter.com/m8Na15SJiO
— Kavish Aziz (@azizkavish) March 7, 2025
एवढेच नाही तर हे लोक मेटल डिटेक्टर सोबत आणतात. या मेटल डिटेक्टरच्या मदतीने जमिनीत गाडलेलं सोनं आपल्याला सापडेल अशी या लोकांची अपेक्षा असते.