Raja Raghuvanshi Case New Update: संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडामध्ये आता तपास जसजसा पुढे जात आहे तसतसा नवा उलगडा होताना दिसत आहे. या प्रकरणात सुरुवातीला राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची पत्नी सोनमचा शोध घेण्याचं काम पोलीस आणि तपास यंत्रणा करत होत्या. त्यातच तपासाला नवं वळण तेव्हा मिळालं जेव्हा सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथं असणाऱ्या एका ढाब्य़ावरून ताब्यात घेण्य़ात आलं.
इथं राजा रघुवंशी हत्याकांडानं देश हादरला असतानाच दुसरीकडे आणखी एक जोडपं हनिमूनला गेलं असता तिथंच बेपत्ता झाल्यानं या जोडप्याच्या कुटुंबीयांनीसुद्धा आता चिंतेचा सूर आळवला आहे. हनिमूनसाठी सिक्कीमला गेलेल्या या जोडप्यासोबत भूस्खनानंतर नेमकं काय घडलं हे अद्यापही त्यांच्या कुटुंबाला कळू शकेलं नाही. मात्र, मुलासह सुनेचा शोध घेतल्याशिवाय घरी परतणार नसल्याच्या भूमिकेवर कुटुंबीय ठाम आहेत.
उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील रहिवासी कौशलेंद्र प्रताप सिंह आणि अंकिता सिंह यांचा विवाह 5 मे रोजी पार पडला होता. 24 मे रोजी हे दोघं लग्नानंतर फिरण्यासाठी म्हणून सिक्कीमला रवाना झाले. 29 मे रोजी ते तिथं भूस्खलनाच्या तडाख्यात सापडले. त्यांची कार भूस्खनात सापडल्याची प्राथमिक माहिरी समोर आली होती. ही घटना इतकी भीषण होती की, मंगन जिल्ह्यातील तिस्ता नदीमध्ये थेट 1000 फूट खोलवर त्यांची कार कोसळली. प्राथमिक माहितीनुसार या कारमध्ये 9 जण असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर दोघं गंभीररित्या जखमी झाले होते. याच कारमधील उर्वरित प्रवासी अद्यापही बेपत्ता असून त्यातच कौशलेंद्र आणि अंकिताही असल्याचं म्हटलं जात आहे.
कौशलेंद्रच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्याच्या वडिलांनी सिक्कीम गाठलं आणि तिथं आपल्या मुलासह सुनेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी तिथूनच एक व्हिडीओ संदेश जारी करत सिक्कीममधील प्रशासनाला आवाहन करत एका नाल्यात वाहन पडल्यापासून आपली सून आणि मुलगा बेपत्ता असल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिलं. जोपर्यंत मुलगा आणि सुनेचा शोध लागत नाही, तोपर्यंत घरी परतणार नसल्याच्याच भूमिकेवर ते ठाम असून, त्यांनी यंत्रणांनी आपल्याला यात सहकार्य करावं असंही आवाहन केलं आहे.