Aadhar card, PAN card Latest Update : कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी भारतीय असल्याचा वैध पुरावा विचारल्यास आधार आणि पॅन कार्ड सादर केलं जातं आणि ते ग्राह्यसुद्धा धरलं जातं. आता मात्र भारतातील एका राज्यामध्ये हे पुरावे नागरिकांना भारताचं नागरिकत्वं सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीयेत. कारण, त्यासाठी दोन महत्त्वाचे पुरावे अनिवार्य करण्यात आले आहेत.
तिथं भारतात पाकिस्तानी नागरिकांविरोधातील कारवाईला वेग आला असून या नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी यंत्रणांनी कठोर निर्बंध लागू केले असतानाच आता दिल्लीमध्येही बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधातील कारवाईला नवं वळण मिळालं आहे.
अवैधरित्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांना आता भारतीय नागरिकत्वं सिद्ध करण्यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड सादर करणं पुरेसं ठरणार नाही. तर, त्यासाठी मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट हे दोन पुरावेच अंतिम स्वरुपात ग्राह्य धरले जाणार आहेत. केंद्र शासनानं जारी केलेल्या निर्देशांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून, अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
साधारण वर्षभरापूर्वी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या पुनर्पडताळणी मोहिमेदरम्यान दिल्लीत मोठ्या संख्येनं बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी झाल्याची बाब लक्षात आली, जिथं ही मंडळी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड असे पुरावे दाखवून आपण भारतीय नागरिक असल्याचं भासवत होते. अनेक नागरिकांकडे तर UNHCR नं जारी केलेले शरणार्थी कार्डसुद्धा आढळले. यामुळं नागरिकांमधून भारताचे नेमके नागरिक ओळखणं आव्हानात्मक ठरलं आणि त्याच कारणास्तव आता या अवैध नागरिकांना पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र हे पुरावे सादर करणं बंधनकारक ठरणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या या कारवाईमध्ये विशेषत: पाकिस्तानी नागरिकांवर करडी नजर ठेवली जात असून, आतापर्यंत दिल्लीतील 3500 पाकिस्तानी नागरिकांपैकी 400 जणांना माघारी पाठवण्यात आलं आहे.