DGCA Action on Air India : अहमदाबादमध्ये 12 जूनला एअर इंडियाचा विमानाला अपघात झाला. या अपघातात विमानातील फक्त एक प्रवाशी वाचला. तर 241 जणांचा मृत्यू झाला. हे विमान लंडना जात असताना वसतिगृहावर कोसळलं. त्यातील 24 जणांसह एकूण 265 जणांचा नाहक बळी गेला. आता या प्रकरणात डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) ने मोठी कारवाई केली आहे.
डीजीसीएने एअर इंडियाला क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्यांमधून "ऑपरेशनल त्रुटींसाठी जबाबदार" असलेल्या तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही अधिकारी ऑपरेशनल त्रुटींसाठी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे आणि आता त्यांना कोणत्याही क्रू व्यवस्थापन कामापासून दूर ठेवले जाईल.
डीजीसीएने एअर इंडियाला या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आणि त्यांच्या प्रगतीचा आणि निकालांचा अहवाल 10 दिवसांच्या आत संस्थेला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एअरलाइनच्या सुरक्षा आणि ऑपरेशनल मानकांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून डीजीसीएने एअर इंडियाला त्यांच्या वेळापत्रक प्रक्रिया सुधारण्यास सांगितलं आहे. डीजीसीएने असेही स्पष्ट केलं आहे की उड्डाण सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
12 जून रोजी झालेल्या या भयानक विमान अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. टेकऑफ दरम्यान विमानाचा तोल गेला आणि जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळल्याने हा अपघात झाला.
या घटनेत मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये जेवणाऱ्या अनेक डॉक्टरांचाही मृत्यू झाला. या भयानक घटनेने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे.