Marathi News> भारत
Advertisement

भारतातला एकमेव डॉक्टर जो अवघ्या 2 रुपयांत करायचा उपचार, पैसे नसतील तर..; एके रायरुंची प्रेरणादायी कहाणी!

2 Rupee Doctor: प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसेवक डॉक्टर ए.के. रायरू गोपाल यांचे केरळमधील कन्नूर येथे निधन झाले. 

भारतातला एकमेव डॉक्टर जो अवघ्या 2 रुपयांत करायचा उपचार, पैसे नसतील तर..; एके रायरुंची प्रेरणादायी कहाणी!

2 Rupee Doctor: सध्याच्या जमान्यात शिक्षण आणि आरोग्य याचा धंदा सुरु आहे. असे असतानाही कोणी डॉक्टर अवघे 2 रुपये घेऊन रुग्णांवर उपचार करतोय असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. पण त्या डॉक्टरांचं निधन झालंय. प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसेवक डॉक्टर ए.के. रायरू गोपाल यांचे केरळमधील कन्नूर येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते आणि गेल्या 5 दशकांपासून ते त्यांच्या क्लिनिकमध्ये हजारो गरीब रुग्णांवर फक्त 2 रुपयांमध्ये उपचार करत होते. डॉक्टर गोपाल त्यांच्या 'लक्ष्मी' या निवासस्थानी असलेल्या क्लिनिकमध्ये दररोज रुग्णांना भेटत असत.

रोज 12 तास सुरु असायचे क्लिनिक

डॉक्टर गोपाल यांचे क्लिनिक पहाटे 4 वाजता सुरू होऊन दुपारी 4 वाजेपर्यंत चालायचे. दररोज शेकडो रुग्ण येत असत आणि डॉ. गोपाळ त्यांच्यावर फक्त दोन रुपयांत उपचार करत असत. डॉ. गोपाळ यांची सेवाभावना अशी होती की ज्या रुग्णांकडे औषधे खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते त्यांनाही ते औषधे देत असत. गरीब रुग्णांसाठी ते एक मोठा दिलासा होते. त्यांच्या जाण्याने परिसरातील लोकांना खूप दुःख झाले आहे.

'उपचार ही सेवा आहे, व्यवसाय नाही'

डॉ. गोपाल यांना राज्यातील सर्वोत्तम फॅमिली डॉक्टर म्हणून आयएमए पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. मे 2024 मध्ये त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना त्यांचे क्लिनिक बंद करावे लागले होते. ज्यामुळे त्यांच्या रुग्णांची खूप निराशा झाली. दरम्यान डॉक्टरांवर पय्यम्बलम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जिथे समाजाने अशा माणसाला निरोप दिला ज्याने सिद्ध केले की औषध ही सेवा आहे, व्यवसाय नाही.

मुख्यमंत्र्यांकडून शोकसंवेदना 

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनीही 'लोकांचे डॉक्टर' म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर रायारू गोपाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, अर्ध्या शतकापासून ते त्यांच्या सल्लामसलत सेवेसाठी फक्त 2 रुपये आकारत होते. लोकांची सेवा करण्याची त्यांची इच्छा गरीब रुग्णांसाठी एक मोठी दिलासा देणारी होती. दुपारी पय्यम्बलम येथे डॉक्टरांचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिसरातील लोकांना खूप दुःख झाले आहे आणि ते नेहमीच एक खरे समाजसेवक म्हणून लक्षात राहतील.

Read More