Marathi News> भारत
Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचा साधेपणा... 'त्या' एका कृतीनं सिद्ध झालेला सूर्यपुत्राचा मोठेपणा

Ambedkar Jayanti 2025 : महामानवाच्या मुलासंदर्भातील एक असा किस्सा जो खूप काही शिकवून जातो. कसं होतं वडील- मुलाचं नातं?  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचा साधेपणा... 'त्या' एका कृतीनं सिद्ध झालेला सूर्यपुत्राचा मोठेपणा

Ambedkar Jayanti 2025 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी कैक पिढ्यांच्या भवितव्याचा पाया रचला. समाजाला बाबासाहेबांनी दाखवलेली वाट ही कायमच एका क्रांतिच्या आणि प्रगतीच्या दिशेनं नेताना दिसली. अशा या बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी आणि वारसा पुढे नेला तो म्हणजे त्यांच्या मुलानं अर्थात यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांनी. 

निष्ठा आणि स्वाभिमान... 

भैय्यासाहेब आणि बाबासाहेबांच्या नात्यावर भाष्य करणारा एक किस्सा सांगितला जातो, एक असा क्षण जिथं भैय्यासाहेबांना निष्ठा आणि स्वाभिमानाची कायमस्वरुपी लक्षात राहण्याजोगी शिकवण मिळाली. दिल्लीतील ठेकेदारानं भैय्यासाहेबांसोबत काम करत त्यांना नफ्याची आमिष दाखवलं, ही बाब बाबासाहेबांना कळताच त्यांनी आपल्या या मुलाला घरी जेवण करु न देताच तडक मुंबईला पाठवलं होतं. इथं त्यांना नितीमूल्यांची खरी शिकवण मिळाली आणि याच प्रसंगाची खुणगाठ त्यांनी मनाशी कायमस्वरुपी बांधली. 

वडिलांच्या आदर्शांना केंद्रस्थानी ठेवत कायमच भैय्यासाहेब समाजात अगदी सामान्य आयुष्य जगले. मुंबईत एका न्यायालयीन कामासाठी गेलं असता तिथं भैय्यासाहेब रांगेतच उभे राहिले. तिथं काहींना त्यांचा परिचयही आला मात्र रांगेची शिस्त त्यांनीही पाळली. सामान्यांपैकीच आपणही एक आहोत हीच त्यांची भूमिका. तत्त्वांना धरून चालणाऱ्या याच भैय्यासाहेबांना त्यांचा साधेपणा आणि त्यांच्या विचारसरणीमुळं सूर्यपुत्र म्हणून संबोधलं जात असे. 

बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या याच मुलानं धम्मकार्यात सहभाग घेत पुढाकारानं समाजसेवेची ही ज्योत तेवत ठेवली. प्रिंटींग प्रेस सुरू करत त्यांनी विचारप्रसाराचं कार्य हाती घेत ही जबाबदारी लिलया पेलली. उद्योगविश्वातील या कामगिरीनंतर 'जनता' आणि 'प्रबुद्ध भारत' ही दोन्ही मुखपत्र चालवण्याची जबाबदारी भैय्यासाहेबांनी स्वीकारली आणि त्याच्या व्यवस्थापनासह संपादनाचं काम स्वीकारलं. 

भैय्यासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या 'थॉट्स ऑन पाकिस्तान' या ग्रंथाचं प्रकाशन केलं. अनेक स्मारकांच्या उभारणीमध्ये बाबासाहेबांचं योगदान मोलाचं समजलं जात असून चैत्यभूमीसुद्धा त्यातील एक उदाहरण. 17 सप्टेंबर 1977 रोजी भैय्यासाहेबांचं निधन झालं, पण आजही सूत्रपुत्राचं नाव तितक्याच आदरानं घेतलं जातं हे खरं. 

Read More