Repo Rate Cut These Banks Slashed Lending Rates: सध्या जगभरात अमेरिकेने लादलेल्या रिव्हर्स टॅरिफची जोरदार चर्चा असून याचा फटका भारतालाही बसला आहे. अमेरिकेने भारतावर लादलेल्या रिव्हर्स टॅरिफच्या पार्श्वभूमीवर भारतामधील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेत मोठा निर्णय बुधवारी घेतला. आरबीआयने रेपो रेट पाव टक्क्यांनी कमी केला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी ही घोषणा केली. या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर सर्व प्रकारची कर्ज अधिक स्वस्त झाली असून कर्ज घेतलेल्यांनाही मासिक इएमआयमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आरबीआयच्या घोषणेनंतर देशातील दोन महत्त्वाच्या बँकांनी काही तासांमध्ये आपल्या व्याजदरांनामध्ये कपात करत ग्राहकांना दिलासा दिला आहे.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आरबीआयने रेपो रेट 25 बेसिक पॉइण्ट्सने म्हणजेच पाव टक्क्यांनी कमी करुन 6.25 टक्के इतका केला होता. पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो रेट 6.25 टक्क्यांवर गेलेला असतानाच आता त्यामध्ये बुधवारी पुन्हा 0.25 टक्क्यांची कपात करुन तो 6 टक्के इतका निश्चित करण्यात आला. या निर्णयानंतर काही तासांमध्येच सार्वजनिक क्षेत्राबरोबरच एकूण चार बँकांनी व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. बँक ऑफ इंडिया आणि यूको बँकेने कर्जदरात पाव टक्के (25 आधार बिंदू) कपातीची घोषणा बुधवारी सायंकाळी केली. ज्यामुळे विद्यमान ग्राहकांसह नवीन कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. नवीन ग्राहकांना गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज कमी दराने मिळविता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा व्याजदर कपात केल्याने बँकांनी देखील ग्राहकांना दर कपातीचा लाभ देऊ केला आहे. येत्या काही सत्रात इतर बँकांकडूनही लवकरच अशाच प्रकारच्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबरोबरच चेन्नईमधील इंडियन बँकेने त्यांच्या व्याजदरांमध्ये कपात केली असून ही कपात 11 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेनेही कालच व्याजदरांमध्ये कपात केल्याची घोषणा करत नवीन व्याजदर 10 एप्रिलपासून लागू होतील असं जाहीर केलं आहे.
बँक ऑफ इंडियाचा नवीन रेपो आधारित कर्जदर (ईबीएलआर) पूर्वीच्या 9.10 टक्क्यांवरून 8.85 टक्के करण्यात आला आहे. हे नवीन दर बुधवारपासूनच लागू करण्यात आले आहेत. यूको बँकेने देखील रेपो संलग्न कर्जदर गुरुवारपासून 8.8 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे.
आरबीआय ही देशातील बँकांची बँक असून ही केंद्रीय बँक सर्व बँकांना वित्तपुरवठा करते. ज्या दरानं किंवा ज्या टक्केवारीनं आरबीआयकडून इतर बँकांना कर्ज दिलं जातं त्या आकडेवारीला रेपो रेट असं म्हटलं जातं. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास आरबीआयकडून बँकांनाच महागड्या दरात कर्ज मिळणार असा त्याचा थेट अर्थ होतो. परिणामी गृहकर्जापासून खासगी कर्जामध्येही व्याजदर वाढ होते. मात्र रेपो रेट कमी झाल्यास त्याचा फायदा ग्राहकांना होतो.
उदाहरण घ्यायचं झालं तर 20 वर्षांसाठी 50 लाखांचं कर्ज 8.25 च्या व्याजदराने घेतलं असेल तर आता या कर्जावर 8 टक्के व्याज भरावं लागणार आहे. म्हणजेच 9 तारखेपूर्वीचा हाफ्ता 42 हजार 603 रुपये असला तर तो पाव टक्क्यांच्या कपातीनंतर 41 हजार 826 रुपये इतका होणार आहे. म्हणजेच दर महिन्याला कर्जदारांचे 777 रुपये वाचणार आहेत. म्हणजेच 20 वर्षांमध्ये कर्जादारांना 1 लाख 85 हजार रुपये वाचणार आहेत.