Raja Raghuvanshi Murder Case: इंदूरचा व्यावसायिक राजा रघुवंशी याची शिलाँगमध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याची बेपत्ता पत्नी सोनम हिचा शोध घेण्यात येत होता. या घटनेनंतर 17 दिवसानंतर उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथे एका ढाब्यावर अचानक सोनम सापडली. सोनम सापडल्यानंतर राजाच्या मृत्यूचे गूढ समोर आले. सोनमनेच सुपारी देऊन राजा रघुवंशीची हत्या केल्याचा दावा केला जातोय. इतकंच नव्हे तर सोनमच्या अटकेनंतर या घटनेतील अनेक खुलासे समोर येत आहेत.
राजाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशी यांनीच मेघालयात हनीमूनला जाण्यासाठी तिथे कुठे थांबायचे आणि हॉटेलचे बुकिंग केले होते. मात्र तिने परत येण्याचे बुकिंग केले नव्हते. राजची आई उमा रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने कदाचित तिथेच तिचा प्लान पुढे नेण्याचा विचार केला होता. सोनमने तिच्या प्लानबद्दल कोणालाच नाही सांगितले. इतकंच नव्हे तर सोनमने तिच्या कुटुंबालाही काही सांगितलं नव्हतं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि राजा मेघालयला जाण्यापूर्वी संपूर्ण सोन्याचे दागिने घेऊन गेले होते. राजाच्या आईने म्हटलं होतं की, राजा चेन आणि अंगठी घालून जात होता तेव्हा त्याला त्यांनी हे सगळं घालून जावू नकोस. पण त्याने म्हटलं की, सोनमला वाटतं की त्याने हे सगळं घालून जावं. राजाच्या आईने पुढे म्हटलं आहे की, जर ती राजावर प्रेम करत होती तर त्याला मरण्यासाठी सोडलं नसतं. ती कशी काय सुरक्षित बचावली? यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा मिळायला पाहिजे.
राजाच्या आईने म्हटलं आहे की, सोनमनेच चेन आणि अंगठी घालून हनिमूनला जावे यासाठी आग्रह केला. आमच्यासोबत तिचे वागणे खूप चांगले होते. ती माझ्याशी नेहमीच चांगलं बोलायचे. सोनम तिच्या आई-वडिलांच्या घरातून विमानतळावरदेखील एकटी गेली होती. सोनमच्या म्हणण्यानुसारच राजा आणि सोनम हनिमूनला जाण्यासाठी विमानतळावरच भेटले होते.