Viral Video: आयुष्यात मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या छोट्या गोष्टीच जास्त हृदयाला भिडतात. एखाद्याला पाय लागला की आदराने माफी मागणे. आईने चविष्ट भाजी केली की तिचं कौतुक करणे. थकून आलेल्या वडिलांना येता हातात चहा देणे. अशा साध्यासुध्या क्षणांमुळे कुटुंब नेहमी आनंदी राहतं. याच भावनेचं सुंदर उदाहरण असलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत पत्नी जेवण बनवताना रागात दिसत आहे. ती चिडचिड करत पटकन पोळ्या लाटत नवऱ्याच्या ताटात वाढत आहे. पण नवरा आपली पत्नी असं का करत आहे याचं कारणही विचारत नाही. उलट तो एक भन्नाट जुगाड करून तिच्या चेहऱ्यावर हसू आणतो. ते म्हणजे नवरा हा रागावलेल्या पत्नीला कापडाचा पंखा हातात घेतो आणि पत्नी पोळी लाटत असताना तिला हळुवार हवा घालायला सुरुवात करतो. हे सर्व पाहून पत्नीच्या चेहऱ्यावरचा राग नाहीसा होतो आणि तिच्या चेहऱ्यावर नकळत गोड हसू उमटतं.
हा व्हिडीओ @you_need_it या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की या व्हिडीओला काही तासांतच हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्येही नेटकरी भावनिक होत म्हणत आहेत की, 'या छोट्या छोट्या गोष्टी स्त्रियांसाठी खूप मोठ्या असतात. अजून काय पाहिजे स्त्रियांना? फक्त आदर आणि आपुलकी. बहुतेक महिला तक्रार करतात कारण त्यांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं जातं. पण जेव्हा जोडीदार एकमेकांच्या मेहनतीचा मान ठेवतात तेव्हा नातं आणखीन फुलतं असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
हा छोटासा व्हिडीओ एक मोठा संदेश देतो. नात्यातील राग, तणाव दूर करण्यासाठी भव्य गिफ्ट्स किंवा मोठ्या गोष्टींची गरज नसते; फक्त थोडीशी काळजी, थोडा आदर पुरेसा असतो. सोशल मीडियावर ट्रेंड होणारा हा व्हिडीओ पाहून एकच विचार मनात येतो की जोडीदार असा असावा, जो रागातही हृदय जिंकून घेईल.
FAQ
हा व्हिडीओ सध्या कशामुळे व्हायरल होत आहे?
हा व्हिडीओ एका नवऱ्याच्या पत्नीला हवा घालून तिचा राग दूर करणाऱ्या छोट्या आणि हृदयाला भिडणाऱ्या कृतीमुळे व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत काय दाखवले आहे?
व्हिडीओत रागावलेली पत्नी पोळ्या लाटताना दिसते, आणि तिचा नवरा तिला कापडाच्या पंख्याने हवा घालून तिच्या चेहऱ्यावर हसू आणतो.
नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या?
नेटकऱ्यांनी असे म्हटले की, छोट्या गोष्टी स्त्रियांसाठी मोठ्या असतात, फक्त आदर आणि आपुलकी पुरे आहे. जोडीदारांनी एकमेकांच्या मेहनतीचा मान ठेवला तर नातं फुलते.