Spacecraft Crash: संपूर्ण जगभरात सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षाचीच चर्चा पाहायला मिळत असताना एका नव्या संकटाची चाहूल लागली आहे. हे संकट अवकाशातून पृथ्वीच्या दिशेनं झेपावत असून त्याची तीव्रताही अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.
तब्बल 53 वर्षांपूर्वी म्हणजेच 1972 मध्ये शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी एक अवकाश यान रशियानं अर्थात तेव्हाच्या सोविएत संघानं पाठवलं होतं. आता पर्यंत हे यान अवकाशातच होतं. आता मात्र त्यानं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. कॉसमॉस 482 असं या यानाचं नाव असून, कुठल्याही क्षणी ते पृथ्वीवर पडू शकते.
4 फूट रुंद आणि 5 फूट उंचीच्या या स्पेसक्राफ्टचं वजन 495 किलो असून ते अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेश यापैकी एक भागात पडण्याची दाट शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे या स्पेसक्राफ्टच्या पडण्यावर आता कोणतंही नियंत्रण नसल्यानं, हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत येताना जळणार नाहीय, त्यामुळं नागरी वसाहतीवर तो पडला तर मोठं नुकसान होईल. महत्वाचं म्हणजे सध्या भारत- पाकिस्तान युद्धाच्या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये हे यान कोसळल्यास वेगवेगळ्या अफवाही उडू शकतात अशी माहिती अंतराळ तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली. दरम्यान या परिस्थितीमध्ये अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.
युरोपीय अवकाश संशोधन संस्थेच्या माहितीनुसार अवकाशातून दर दिवशी अनेक गोष्टी पृथ्वीवर पडत असतात. बहुतांश वेळा अवकाशयानाचे अवशेष पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच त्यांचा नाश होतो किंवा उष्णतेमुळं ते तिथेच पेट घेऊन नष्ट होतात. त्यांचा फार कमी भाग पृथ्वीवर कोसळतो. त्यातही पृथ्वीचा 71 ट्क्के भाग हा समुद्रांनी व्यापला असल्यानं अवकाशातून इथं येणाऱ्या गोष्टी जमिनीवर आणि त्याहूनही नागरी वस्त्यांमध्ये कोसळण्याची शक्यता तशी कमीच असते.