Shakuntala Railway: भारतीय रेल्वेचे जाळे हे आशियातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. दररोज हजारो ट्रेन विविध स्थानकातून सुटतात. तर लाखो नागरिक प्रवास करतात. भारतीय रेल्वे हा देशातील सर्वात मोठा विभाग आहे. भारतीय रेल्वेने आता भारतातील अनेक मोक्याच्या ठिकाणापर्यंत रेल्वे नेली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस भारतात सुरू झाली आहे. तर, लवकरच बुलेट ट्रेनही भारतात सुरू होणार आहे. भारतीय रेल्वे दिवसेंदिवस ऐतिहासिक प्रकल्प हाती घेत आहे. असं असूनही आजही आपल्या महाराष्ट्रात असा एक रेल्वे रूळ आहे जो ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. त्यावर भारतीय रेल्वेचा कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नाहीये. ब्रिटनच्या एका खासगी कंपनीकडे या रेल्वे रूळाचे मालकी हक्क आहेत. भारत स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष लोटली तरीदेखील हा रेल्वे रूळ सरकारच्या ताब्यात येऊ शकला नाहीये.
महाराष्ट्रात असलेल्या या रेल्वे रूळाचे नाव शकुंतला रेल्वे ट्रॅक असं आहे. राज्यातील अमरावती ते मुर्तजापूरपर्यंत 190 किमीपर्यंत हा रेल्वे रूळ आहे. ब्रिटिशांच्या काळातील हा रेल्वे रूळ आहे. अत्यंत दूरदृष्टी ठेवून ब्रिटिशांनी या रेल्वे मार्गाचे काम केले होते. अमरावतीमध्ये कापसाची शेती मोठ्या प्रमाणात होत होती. त्यावेळी कापूस मुंबई पोर्टपर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रजांनी या रेल्वे रुळांची निर्मिती केली. ब्रिटनची क्लिक निक्सन अँड कंपनीने या रेल्वे ट्रेक बनवण्यासाठी सेंट्रल प्रोविंस रेल्वे कंपनीची स्थापना केली. या कंपनीने रूळ टाकण्याचे काम 1903 साली सुरू केले आणि 1916 मध्ये रेल्वे रूळांचे काम पूर्ण झाले.
इंग्रजांच्या काळात या रेल्वे ट्रॅकवर शंकुतला पॅसेंजर नावाची एक ट्रेन चालवली जायची. त्यामुळं या रेल्वे ट्रॅकचे नाव शकुंतला पडले. शकुंतला पॅसेंजरला फक्त 5 डब्यांची होती आणि वाफेच्या इंजिनवर चालायची. 1994नंतर या ट्रेनला डिझेलचे इंजिन लावण्यात आले आणि यातील डब्यांची संख्या 7 करण्यात आली. आजही तुम्ही या रेल्वे रुळांजवळ गेलात तर सिग्नलपासून ते अनेक गोष्टी इंग्रजांच्या काळातील दिसतील. शकुंतला पॅसेंजर या ट्रॅकवर जवळपास 6-7 तासांचा प्रवास पूर्ण करते. या दरम्यान ट्रेन अचलपूर, यवतमाळसह 17 वेगवेगळ्या स्थानकांदरम्यान थांबते.
भारत स्वतंत्र्य झाल्यानंतरही या रेल्वे रूळाची मालकी हक्क एका प्रायव्हेट कंपनीकडे आहे. हिच कंपनी हा रेल्वे रूळ संचालित करते. 1947मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय रेल्वेने या कंपनीसोबत एक करार केला होता. त्या अंतर्गंत प्रत्येक वर्षी आजही भारतीय रेल्वेला या कंपनीला रॉलल्टी द्यावी लागते. रिपोर्ट्सनुसार, भारतीय रेल्वे दरवर्षी 1 कोटी 20 लाखांची रॉयल्टी कंपनीला द्यावी लागते. भारतीय रेल्वेकडून कित्येकदा हा रेल्वे रूळ खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र अद्याप त्यावर काही तोडगा काढण्यात आलेला नाही.
2020 पासून बंद आहे शकुंतला पॅसेंजर
शकुंतला रेल्वे रूळ खूप जुना असल्याने आता तो जर्जर झाला आहे. भारत सरकार या रेल्वे रूळासाठी कंपनीला रॉयल्टी तर देते मात्र गेल्या 60 वर्षांपासून या रेल्वे रूळाच्या ट्रॅकचे काम कंपनीकडून करण्यात आलेले नाही. यामुळं शकुंतला पॅसेंजरचा वेगदेखील मंदावला आहे. त्यामुळं 2020 पासून ट्रेन या रेल्वे रूळांवर बंद आहे.