ISRO EOS-09 Satellite: आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून इस्रोने आज सकाळी 5.59 वाजता सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातील पहिल्या लाँच पॅडमधून पीएसएलव्ही-सी61 (PSLV-C61) रॉकेट लाँच केले होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळं इस्रोचे हे मिशन फेल झाले आहे. PSLV रॉकेट तिसरा टप्प्यापर्यंत पोहचू शकला नाही. याची माहिती इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी दिली आहे.
इस्रो प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट लाँच केल्यानंतर पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीपणे पार करण्यात आला. मात्र तिसरा टप्पा पार करण्याआधीच काही तांत्रिक बाबींचा अडथळा आल्याने मिशन पूर्ण होऊ शकले नाही. 'तिसऱ्या टप्प्याचे संचालन सुरू असतानाच आम्हाला तांत्रिक अडचण आढळली. त्यामुळं मिशन तिथेच थांबवण्यात आले. आता आम्ही या डेटाचे विश्लेषण करू त्यानंतर पुन्हा एकदा मिशन यशस्वीरित्या पूर्ण करू', असं त्यांनी म्हटलं आहे.
या मिशनअंतर्गंत EOS-09 (Earth Observation Satellite-09) रॉकेट सूर्याच्या समकालिक कक्षेत (Sun Synchronous Polar Orbit - SSPO) जाणे अपेक्षित होते. EOS-09 मध्ये असलेल्या 'सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडारमुळं कोणत्याही हवामान परिस्थितीत कधीही पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा घेण्यास सक्षम असेल. हा उपग्रह EOS-04 सारखाच असून त्याचे काम पृथ्वीचे फोटो आणि माहिती पाठवणे होते. जेणेकरून महत्त्वाच्या कामांसाठी डेटा मिळवता येईल. तसंच, त्याच्या मदतीने सीमेवर होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाता आले असते.
Today 101st launch was attempted, PSLV-C61 performance was normal till 2nd stage. Due to an observation in 3rd stage, the mission could not be accomplished.
— ISRO (@isro) May 18, 2025
EOS-09 उपग्रहाची रचना देशाच्या रडार सेन्सिंग क्षमतांना अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. दहशतवादीविरोधी कारवाया, घुसखोरी किंवा सीमेवरील संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी डिझाइन केले होते. तसंच, या उपग्रहाच्या माध्यमातून सीमेवरील शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाईल. या उपग्रहाचे वजन अंदाजे 1,710 किलोग्रॅम होते आणि त्यामुळे देशाला आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय देखरेख यासारख्या क्षेत्रात अचूक माहिती मिळण्यास मदत होईल.
दरम्यान, हे मिशन का यशस्वी होऊ शकले नाही याची तपासणी इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून करण्यात येईल. तसंच, भविष्यात ही चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हा उपग्रह खूप खास आहे कारण तो अशा अनेक उपग्रहांचा भाग आहे जे पृथ्वीवर लक्ष ठेवतात आणि कोणते बदल होत आहेत हे शोधतात. हा उपग्रह शेती, वन, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा यासारख्या कामांमध्ये मदत करेल. देशाच्या सीमांवर लक्ष ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे, उपग्रह लाँच होण्याआधी इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती दिली होती.