Marathi News> भारत
Advertisement

...म्हणून मुंबईहून थेट काश्मीरला आलो; पहलगाममध्ये पोहोचताच अतुल कुलकर्णीने सांगितलं खरं कारण

Atul Kulkarni In Pahalgam: मुंबईहून श्रीनगरपर्यंतच्या प्रवासातील काही फोटो अतुलने कुलकर्णीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

...म्हणून मुंबईहून थेट काश्मीरला आलो; पहलगाममध्ये पोहोचताच अतुल कुलकर्णीने सांगितलं खरं कारण

Pahalgam Tourism Atul Kulkarni: काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून आता पर्यटक काश्मीरमध्ये परतणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. असं असतानाच मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी थेट पहलगाममध्ये पोहोचला आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपल्याला फार वाईट वाटल्याचं अतुल कुलकर्णीने म्हटलं आहे. तसेच 90 टक्के पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्याचं पाहून आपण फार दुखी झालो आहोत, असंही अतुल कुलर्णीने म्हटलं आहे. याच कारणामुळे आपण काश्मीरला भेट देत असल्याचं अतुल कुलर्णीने म्हटलं आहे. मुंबईमध्ये बसून केवळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन संदेश देणं मला महत्त्वाचं वाटलं, असंही अतुल कुलकर्णी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

...म्हणून मुंबईहून काश्मीरला आलो

"22 एप्रिल रोजी घडलेली ही घटना फारच धक्कादायक होती. हे घडायला नको होतं. संपूर्ण देश यामुळे दुखी झाला आहे. मी याबद्दल वाचलं तेव्हा मला असा प्रश्न पडला की अशावेळी आपण काय करतो? आपण सोशल मीडियावर पोस्ट करतो, लोकांबरोबर बोलतो आणि काहीतरी लिहीतो. मात्र मी प्रत्यक्षात कृती म्हणून काय करु शकतो असा विचार केला," असं अतुलने एएनआयशी बोलताना सांगितलं.

"त्यावेळी माझ्या वाचनामध्ये असं आलं की 90 टक्के पर्यटकांनी येथील बुकींग रद्द केल्या आहेत. त्यांना (दहशतवाद्यांना) नेमका काय संदेश द्यायचा आहे याचा मी विचार करु लागलो. ते खरं तर असं म्हणत आहेत की काश्मीरमध्ये येऊ नका. मात्र याला आपण कसं उत्तर दिलं पाहिजे की, आम्ही येणार. काश्मीर आमचं आहे. मला हा संदेश मुंबईत बसून देता आला नसता. म्हणूनच मी स्वत: इथे येणं महत्त्वाचं होतं," असं अतुल कुलकर्णी म्हणाला.

रिकाम्या सीट्स

अतुल कुलकर्णीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबईवरुन श्रीनगरच्या प्रवासादरम्यानच्या काही पोस्ट केल्या होत्या. त्याने विमानातील बहुतांश सीट रिकाम्या असल्याचा आणि स्वत:च्या बोर्डींग पासचा फोटो पोस्ट केलेला.

पुन्हा एकदा ही विमानं भरली पाहिजेत

अतुलने विमानातील कर्मचाऱ्यांना त्याला दिलेल्या छोट्या चिठ्ठीचाही फोटो शेअर केला. "मुंबई ते श्रीनगर. विमानातील कर्मचारी सांगत आहेत की विमानं पूर्ण क्षमतेनं जात होती. आता आपल्याला पुन्हा एकदा ही विमानं भरुन जातील असं पाहिलं पाहिजे. चला, काश्मीरला जाऊ," असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. 

रिकाम्या पर्यटनस्थळांचे फोटोही पोस्ट केले

अतुलने पेहलगाममधील पर्यटनस्थळांचे फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये पर्यटनस्थळं रिकामी असल्याचं त्याने दाखवलं आहे.

नक्की वाचा >> 'भारतात हजारो पाकिस्तानी आले कुठून? मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच...', ठाकरेंच्या सेनेचा सवाल

गर्दीच नाही

या ठिकाणांवर सामान्यपणे प्रचंड गर्दी असते. आता या ठिकाणी फारच मोजके लोक दिसत असल्याचं अतुलला अधोरेखित करायचं आहे.

कवितेसहीत पोस्ट

अतुलने इतरही अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. एका फोटोत स्थानिक काश्मिरी लोकांनी, "आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो" असा मजकूर लिहिलेला दिसतोय तर इतर लोक भारतीय झेंडे पकडून उभे आहेत. अतुलने कवितेसहीत स्वत:चे दोन फोटो पोस्ट केले आहेत.

अनेकांनी अतुलने घेतलेल्या या भूमिकेचं कौतुक केल्याचं दिसत आहे. त्याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Read More