Ahmedabad Plane Crash: अमहदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये 241 प्रवाशांनी प्राण गमावले. विमान एका हॉस्टेलजवळ पडल्याने मृतांची संख्या 250 हून अधिक झाली आहे. असं असतानाच या विमान अपघातात मरण पावलेल्या लोकांसंदर्भातील हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. मात्र मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार म्हणावा असं काहीसं सध्या सोशल मीडियावर सुरु असून यालाच वैतागून या अपघातात मरण पावलेल्यांपैकी एका प्रवाशाच्या नातेवाईकाने सोशल मीडियावर या अपघातावरुन इन्फ्लुएन्सर्सला सुनावलं आहे. या खडतर प्रसंगामध्ये मयत व्यक्तींच्या घरच्यांचा सन्मान करा असं आवाहन या व्यक्तीने केलं आहे.
कोमी व्यास आणि तिचा पती प्रतिक जोशी या दोघांबरोबरच त्यांच्या तीन चिमुकल्या मुलींनी अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावले. हे डॉक्टर दांपत्य सहकुटुंब लंडनला स्थायिक होणारं होतं. त्यासाठीच ते अहमदाबादवरुन एअर इंडियाच्या विमानाने निघाले होते. मात्र या पाचही जणांचा दुर्देवी अंत झाला. मात्र या कुटुंबाची गोष्ट आता सोशल मीडियावर अनेकांकडून सांगितली जात आहे. याचदरम्यान कोमीचा चुलत भाऊ कुलदीप भट्टने सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्सवर आणि कंटेंट क्रिएटर्सवर निशाणा साधला आहे. या गंभीर अपघातादरम्यान कुटुंब सदम्यात असताना इन्फ्ल्यूएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्स खोटी माहिती पसरवत असून, मृतांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे छेडछाड केलेले फोटो, व्हिडीओ व्हायरल करत आहेत. काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी हे केलं जात असल्याचं कुलदीपने म्हटलं आहे.
"आमच्या आणि सर्वच 270 मृतांच्या कुटुंबियांची सर्वात मोठी अडचण ही आहे की आम्ही एका मानसिक धक्क्यामधून जात आहोत. त्यातच सोशल मिडिया आणि इन्फ्लुएन्सर्स त्यांचे व्ह्यूज आणि लाईक्स तसेच फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी या अपघाताचे व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने वापरत असून फेरफार केलेली दृष्यं दाखवत आहेत," असा आक्षेप कुलदीपने घेतला आहे.
खासगी फोटोंमध्ये फेरफार करण्यात आल्यासंदर्भात बोलताना कुलदीपने, "कोमी आणि इतर लोक जेव्हा विमानाने लंडनला जात होते तेव्हा त्यांनी सेल्फी क्लिक केला आणि फॅमेली ग्रुपवर टाकला. आता हा फोटो व्हायरल झालाय. या फोटोच्या माध्यमातून लोक व्हिडीओ तयार करत आहेत. असाच एक एआय जनरेटेड व्हिडीओ देशभरात व्हायरल झालाय. या फोटोतून एक खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे," असं म्हटलंय.
मयत जोडप्याची कन्या मायराचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याचं कुटुंबाला फार वाईट वाटत असल्याचं कुलदीपने म्हटलं आहे. "कालपासून सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला असून त्याचा आम्हाला त्रास होतोय. ही मायरा आहे फार छान होती. आता आम्हाला डीएनए चाचण्यांबद्दलची काहीही कल्पना नाही. डीएनए अजून जुळलेला नाही. सोशल मीडियावर लोक तिचा देह जळून खाक झाल्याचं म्हणत आहेत. तिचा अंत्यविधी करण्यात आल्याचे खोटो व्हिडीओही व्हायरल झालेत," असं कुलदीपने म्हटलं आहे.
सोशल मीडियावर कोमीच्या नावाने खोटी अकाऊंट्स सुरु करण्यात आल्याने आधीच पाच सदस्य गमावलेल्या या कुटुंबाच्या दुखामध्ये अशा घटनांमुळे अधिक भर पडत आहे. या सोशल मिडिया अकाऊंटवरुन तिच्या फोटोंचा गैरवापर केला जात आहे. अशाप्रकारे मयत कुटुंबाचे फोटो न वापरण्याचं आवाहन कुलदीपने केलं आहे. असे फोटो वापरुन मृतांच्या कुटुंबियांना अधिक मानसिक त्रास का दिला जातोय? फक्त लाइक आणि शेअर्ससाठी का? असा सवाल कुलदीपने विचारलाय. "कोमीचे फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहे. खोटी खाती तयार करण्यात आली आहेत. सर्व सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्सने कृपा करुन हे सर्व थांबवावं अशी माझी विनंती आहे," असंही कुलदीपने म्हटलं आहे. संबंधित संस्था आणि कुटुंबीय खरी माहिती देतील. मात्र खोटी माहिती पसरवू नका असंही कुलदीप म्हणाला आहे.