Monsoon 2025 : यंदाचा उकाडा प्रचंड तापदायक ठरणार असा प्राथमिक इशारा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागानं जारी केला होता. त्याचप्रमाणं गोष्टी घडत गेल्या आणि राज्यात तापमानाचा कमाल आकडा 45 अंशांपर्यंत पोहोचला. विदर्भ, मराठवाडा इतकंच काय तर अगदी मुंबईसुद्धा उकाड्यानं होरपळून निघाली.
देशभरातील विविध राज्यसुद्धा यास अपवाद ठरली नाहीत. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्लीमध्ये उकाड्यानं नागरिक हैराण झाले. मार्च- एप्रिलमध्ये तर परिस्थिती असह्य झाली आणि अनेकांनाच मे महिन्याची चिंता लागून राहिली. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानानं चक्क हातावर तुरी दिली आणि देशभरात कमीजास्त प्रमाणात पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. कुठे याला मान्सूनपूर्व पावसाचं नाव मिळालं, तर कुठे अवकाळी. राहता राहिला प्रश्न मान्सूनच्या आगमनाचा तर, आता त्यासंदर्भातील तारीखच हवामान विभागानं समोर आणली आहे.
यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होईल, असा अंदाज नैऋत्य मान्सून वाऱ्यांबाबत वर्तवण्यात आला होता. त्यातच आता थेट मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्तच जाहीर करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार मान्सून 13 मे पर्यंत अंदमन निकोबार बेट समुहावर दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त करत दरवर्षीच्या तुलनेत यंदा 8 ते 10 दिवस आधीच आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सध्याच्या घडीला निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झाली असून, हवेचा दाब कमी झाल्याने या हालचालींना वेग आला असून सलग पन्नास दिवस चाललेल्या उष्णतेचा परिणाम झाल्याने मान्सून दहा दिवस आधीच अंदमनात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं एका अर्थी मान्सूच्या या अपेक्षेहून आधी दाखल होण्यास उकाड्याचीच कृपा आहे असं म्हणणं गैरही ठरणार नाही.