Marathi News> भारत
Advertisement

जावयासोबत पळून गेलेल्या सासूला नेपाळच्या सीमेवर अटक, चौकशीत धक्कादायक खुलासा, म्हणाली, 'मला मारहाण...'

मुलीचं लग्न ठरलेलं असतानाच 6 एप्रिलला अनिता आपला होणारा जावई राहुलसोबत पळून गेली होती.   

जावयासोबत पळून गेलेल्या सासूला नेपाळच्या सीमेवर अटक, चौकशीत धक्कादायक खुलासा, म्हणाली, 'मला मारहाण...'

उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील एका अजब प्रेमप्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. येथे एक सासू चक्क आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान पोलीस अनेक ठिकाणी धाड टाकून त्यांचा शोध घेत होते. अखेर आज म्हणजे बुधवारी पोलीस दोघांचा शोध लावण्यात यशस्वी झाले आहेत. दोघांना नेपाळच्या सीमेवरुन पोलिसांनी अटक केली आहे.  

आज 16 एप्रिल रोजी राहुल आणि शिवानी यांचं लग्न होणार आहे. योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी पोलिसांनी राहुल (जावई) आणि अनिता (सासू) यांना अटक केली आहे. 

लग्नाला 10 दिवस शिल्लक असतानाच 6 एप्रिल रोजी अनिता आपला होणारा जावई राहुलसोबत पळून गेली होती. पोलिसांनी दोघांच्या मोबाईलच्या आधारे त्यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यांचे मोबाईल फोन 10 दिवस स्विच ऑफ होते. राहुल आपला मोबाईल सुरु करताच पोलिसांनी त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांना नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली. 

महिलेचा खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने चौकशीत सांगितलं की, आपला नवरा दारु पिऊन नेहमी मारहाण करायचा. मुलीचं लग्न ठरल्यानंतर राहुलचं आणि माझं फोनवरुन बोलणं होत असे. त्यामुळे मुलगीही आपल्यावर आरोप करु लागली होती. अखेर आपण राहुलसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. 

त्यांनी पळ कसा काढला?

पोलीस तपासादरम्यान आढळून आलं की दोघेही अलीगढहून कासगंज रेल्वे स्टेशनला गेले होते. तेथून त्यांनी उत्तराखंडमधील रुद्रपूरची तिकिटं खरेदी केली. कासगंज व्यतिरिक्त पोलिसांना दोघांचीही वेगवेगळी ठिकाणे सापडली आहेत.

गावातील काही महिलांनी राहुलवर अनितावर काळी जादू केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, “तिचा नवरा वर्षानुवर्षे घराबाहेर काम करत आहे, मग ती आधी का पळून गेली नाही?” दरम्यान संपूर्ण गाव या घटनेनंतर संतापलं असून दोघांवरही कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

Read More