उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे जावयासह पळून गेलेल्या सासूला उत्तर प्रदेश पोलिसांनी नेपाळ सीमेवरुन अटक केली आहे. दोघेजण गेल्या 10 दिवसांपासून पोलिसांसह लपून फिरत होते. अटक केल्यानंतर पोलीस दोघांना घेऊन अलीगडच्या पोलीस ठाण्यात दाखल झाली. यानंतर दोघांना मडराक पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. यादरम्यान चौकशी करण्यात आली असता, दोघांनी धक्कादायक खुलासे केले. चौकशीदरम्यान सासू सपना उर्फ अनिताने जावयासह पळून जाण्याचं कारण सांगितलं. तसंच आपली जावयासह राहण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान पती मारहाण करत असल्याचा आरोप केला आहे. सपनाने पोलिसांकडे मडराक स्टेशनला न पाठवण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी ही विनंती फेटाळून लावली.
पोलिस चौकशीत अनिताने सांगितले की, तिचा पती जितेंद्र कुमार दारू पिऊन तिला दररोज मारहाण करायचा. महिलेने सांगितलं की जेव्हा तिच्या मुलीचं लग्न राहुलशी ठरलं तेव्हा त्याचे फोन येऊ लागले. जेव्हा ती राहुलशी बोलू लागली तेव्हा मुलीने शंका व्यक्त करायला सुरुवात केली. ती विविध प्रकारचे आरोप करायची. नवरा शिवीगाळ करायचा. अशा परिस्थितीत मला माझ्या जावयासह पळून जावं लागलं.
पोलिसांनी अनिता उर्फ सपनाला अटक करताच ती ढसाढसा रडू लागली. सासू अनिता म्हणाली की, तिचा नवरा आणि मुलगी तिची निंदा करायचे. नवरा राहुलसोबतच्या अवैध संबंधांबद्दल बोलायचा. जेव्हा मी राहुलला हे सांगितलं तेव्हा त्याने माझं दुःख समजून घेतलं. मला राहुल आवडू लागला. आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मी राहुलवर प्रेम करते आणि करत राहीन. मला माझे उर्वरित आयुष्य राहुलसोबत घालवायचं आहे.
अनिताने घरातून दागिने आणि रोख रक्कम पळवून नेल्याचा आरोप खोटा असल्याचं सांगितलं आहे. माझ्या मुलीच्या टोमण्यांना मी कंटाळले होते. म्हणून मी राहुलसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला असा तिचा दावा आहे.
दुसरीकडे राहुलने सांगितलं की, 6 एप्रिल रोजी तो सपनाला अलीगढहून कासगंजला घेऊन आला. मग बसमध्ये चढलो आणि बरेलीला पोहोचलो. यानंतर तो बिहारमधील मुझफ्फरपूरला गेला. दोन दिवसांपूर्वी मी माझा मोबाईल सुरु करुन पाहिलं तेव्हा सोशल मीडियावर आमच्या प्रेमसंबंधाबद्दल बरीच चर्चा सुरू होती. आम्ही मुजफ्फरपूरहून दिल्लीला पोहोचलो. तिथून नेपाळ सीमेवर पोहोचलो. आम्ही नेपाळला जाणार होतो पण पोलिसांनी आम्हाला पकडलं.
राहुलने सांगितलं की, त्यांनी 10 दिवसांत अनेक ठिकाणे बदलली. ते पळून पळून दमले होते. राहुलचा दावा आहे की त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. पोलिसांनी मात्र दोघांनाही अटक केल्याचा दावा केला आहे. यापूर्वी, दोघांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या राहुलच्या मेहुण्याने पोलिसांसमोरे धक्कादायक खुलासा केला होता. तो म्हणाला की, राहुलने एखाद्यासब पळून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, राहुल शेजारच्या गावातील एका महिलेसोबत पळून गेला होता. त्यावेळी महिलेच्या कुटुंबाने कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती.