Japanese Army Refuse Salary: भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या भागामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने गोळीबार, ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न होताना दिसत आहे. भारतीय संरक्षण दलाने केलेल्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराबरोबरच संरक्षण दलाचे धिंडवडे निघाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्यामधील फरक सांगितला आहे. भारतीय सैन्य हे 'प्रोफेशनल' असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याचा संदर्भ देताना, 'पाकड्यांचे सैन्य जुगारी, नशेबाज, चैनबाज आहे,' असं राऊतांनी म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी जपानी सैनिकांच्या एका खास वैशिष्ट्याबद्दलही भाष्य केलं आहे.
"जो पाकिस्तान भारताविरुद्ध गरळ ओकतो व दहशतवादी कारवाया घडवतो, त्याचे सैन्य जगातील सगळ्यात भ्रष्ट, व्यभिचारी आणि चैनबाज आहे. पाकिस्तानी सैन्याबद्दल तेथील जनतेला आदर नाही. त्यांना सत्ता आणि चैनबाजीची चटक लागली. माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरंगात आहेत व त्यांच्यावर एका `मेजर' हुद्द्याच्या सैन्य अधिकाऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला. नव्हे, बलात्कार केला. हे पाक सैन्याचे चरित्र आहे. चरित्र नसलेले सैन्य भारतासमोर उभे आहे. हे सैन्य अवगुणी आहे," असा टोला राऊतांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरातून लगावला आहे.
"नेपोलियनच्या जीवनातील एक प्रसंग देतो व विषय संपवतो. एका अधिकाऱ्याला नेपोलियनने पदावरून हटवले तेव्हा त्याचा एक मित्र नेपोलियनकडे रदबदली करायला गेला. तेव्हा नेपोलियनने त्याला उत्तर दिले ते महत्त्वाचे, "तो माणूस जुगारी आहे. त्याला अशा अधिकार पदावर ठेवून कसे चालेल? उद्या माझ्या सैनिकांच्या जिवाशी तो खेळेल आणि देशाची सुरक्षा जुगारावर लावेल. अशा जुगाऱ्याला मी माझ्या सैन्यात ठेवणार नाही. मी माझ्या सैन्याची प्रतिष्ठा जपतो." नेपोलियनचे हे उद्गार तो उत्तम सेनापती व सैनिक असल्याचे दर्शवते," असं राऊत लेखाच्या शेवटी म्हणाले आहेत.
"माणसाला उंची नसली म्हणजे तो लढायला नालायक असे म्हणणे जपानी सैनिकांचा अपमान ठरेल. जपानच्या हवाई दलात चष्मा लावणारे पायलट होते. त्यामुळे त्यांना विमाने उडविण्यात व युद्ध करण्यात कोणतीच अडचण निर्माण झाली नाही. त्यांच्या `कामिकाझे' वैमानिकांनी ब्रिटनच्या अजस्र युद्धनौका बुडवल्या. सैन्य पोटावर चालते व त्या पगारी फौजा आहेत हा समज बराच काळ जपानी सैनिकांनी खोटा ठरवला होता. जपानी सैन्यातले अधिकारी दोन्ही महायुद्धांत फक्त शांततेच्या काळात पगार घेत असत. युद्ध सुरू झाल्यावर कोणताही जपानी अधिकारी पगार घेत नसे व त्याचे कारण ते असे सांगत की, 'आम्ही पैशांकरिता आपला जीव द्यायला तयार नसतो. आम्ही देशाकरिता मरावयास तयार असतो.' युद्ध चालू असताना सर्व जपानी अधिकाऱ्यांच्या बायका कामे करून आपला घर-संसार चालवीत असत. त्यामुळे संपूर्ण समाज त्यांच्याकडे आदराने पाहत असे. आता असे कोठेच नाही," असं म्हणत राऊतांनी जपानी लष्कराचं कौतुक केलं आहे.
"पाकिस्तान हा देश बॅ. जीना यांनी निर्माण केला व लोकशाही, संसद असताना तेथील सैन्यालाही राजकारणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिला. त्याचे परिणाम पाकिस्तान व जग भोगत आहे. पाकड्यांचे सैन्य जुगारी, नशेबाज, चैनबाज आहे. त्यामुळे ते भारतीय सैन्याप्रमाणे `प्रोफेशनल' नाही. असे जुगारी, नशेबाज सैन्य धोकादायक असते. त्यांना मुळापासूनच उखडायला हवे. भारतीय सैन्य हे पवित्र काम फत्ते करेल," असा विश्वास राऊत यांनी लेखाच्या शेवटच्या ओळीत व्यक्त केला आहे.