Marathi News> भारत
Advertisement

'काश्मीरी लोक 1947 ला पाकिस्तानसोबत नाही गेले तर...'; फारुख अब्दुल्लांचा थेट इशारा

Pahalgam Attack Farooq Abdullah Message To Pakistan: नॅशनल कॉन्फर्न्सचे अध्यक्ष असलेल्या फारुख अब्दुल्ला यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या.

'काश्मीरी लोक 1947 ला पाकिस्तानसोबत नाही गेले तर...'; फारुख अब्दुल्लांचा थेट इशारा

Farooq Abdullah On Two Nation Theory: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सोमवारी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. काश्मीरी लोकांनी 1947 सालीच दोन राष्ट्रांची थेअरी पाण्यात फेकून दिली आहे. आम्हाला पाकिस्तानसोबत जायचं नाही हे त्यावेळीच काश्मीरी लोकांनी स्पष्ट केल्याचं अब्दुल्ला म्हणाले आहेत. 

असे उत्तर द्यावे की...

नॅशनल कॉन्फर्न्सचे अध्यक्ष असलेल्या अब्दुल्ला यांनी यापूर्वी आपण पाकिस्तानबरोबर संवाद साधावा अशी भूमिका घेत होतो. मात्र आता केंद्र सरकारने अशी कारवाई करावी की पुन्हा पहलगामसारखे हल्ले होता कामा नये, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नोंदवली आहे. "पाकिस्तानबरोबर चर्चा व्हावी असं मी नेहमी म्हणायचो. मात्र आता अशी भूमिका घेतली तर ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या प्रियजनांना काय उत्तर द्यायचं?" असा सवाल अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. "आपण लोकांना न्याय देत आहोत का? बालाकोटबद्दल नाही बोलत आहे मी. आज देशाची अशी इच्छा आहे की या हल्ल्याविरोधात इतकी कठोर कारवाई केली जावी ज्यामुळे हल्लेखोरांना कायमचा धडा मिळेल आणि असे हल्ले कायमचे बंद होतील," अशी अपेक्षा अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.

तेव्हा आम्ही पाकिस्तानबरोबर गेलो नाही तर...

दोन राष्ट्रांच्या थेअरीसंदर्भात बोलताना अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी 1947 मध्येच टू नेशन थेअरी नाकारली होती. येथील लोक ती आजही स्वीकारण्यास तयार नाही. "आपल्या शेजाऱ्यांनी माणुसकीची हत्या केली आहे हे मान्य करण्यास ते तयार नाहीत याचा आम्हाला खेद आहे. असं करुन त्यांना आम्ही पाकिस्तानसोबत जाऊ असं वाटत असेल तर आम्ही त्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे. आम्ही 1947 साली त्यांच्यासोबत गेलो नव्हतो तर आज का जाऊ? आम्ही त्यावेळीच टू नेशन थेअरी पाण्यात बुडवली होती. आजही आम्ही ती स्वीकारण्यास तयार नाही. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन सारे एक आहोत. आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देणार," असं अब्दुल्ला म्हणाले. 

पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचं वादग्रस्त विधान

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधीच पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल असिम मुनीर यांनी टू नेशन थेअरीचा संदर्भ आपल्या भाषणात दिलेला. 16 एप्रिल रोजी इस्लामाबादमधील कार्यक्रमात बोलताना, मुनीर यांनी पाकिस्तानने काश्मीरी लोकांसोबत उभं राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. भारताने काश्मीरच्या भूभागावर ताबा मिळवला असल्याचा दावाही मुनीर यांनी आपल्या भाषणात केला होता. तसेच मुनीर यांनी पाकिस्तानी लोकांनी सातत्याने आपल्या मुलांना आपण हिंदूपेक्षा वेगळे असल्याचं सांगत राहिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read More