Marathi News> भारत
Advertisement

'सिंधू नदीत एकतर पाणी वाहणार, नाहीतर रक्ताचे पाट...' बिलावल भुट्टोंसह पाकच्या पंतप्रधानांनी ओकली गरळ

Pahalgam Terror Attack : पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतानं ताशेरे ओढले. ज्यानंतर या शेजारी राष्ट्रातूनही भारताच्या भूमिकांवर प्रतिक्रिया देण्यात आल्या.   

'सिंधू नदीत एकतर पाणी वाहणार, नाहीतर रक्ताचे पाट...' बिलावल भुट्टोंसह पाकच्या पंतप्रधानांनी ओकली गरळ

Pakistan On Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं अनेक निष्पापांचा बळी घेतला आणि जगभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. फक्त भारतच नव्हे, तर इतरही अनेक मित्र राष्ट्रांनी या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानविषयीसुद्धा नाराजीचा सूर आळवला. इथं भारताकडून दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या प्रोत्साहानाचा निषेध करत अनेक करार आणि सीमाभागातून होणारे व्यवहार रद्द करण्यात आले. ज्यामुळं पाकिस्ताननंही भारताविरोधात जाहीर भूमिका घेतली. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नात्यात तणाव कमी होत नसतानाच शेजारी राष्ट्राच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत गरळ ओकली. 

एकतर या नदीतून आमचं पाणी वाहील नाहीतर...

एका जाहीर सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना भुट्टो यांनी सिंधू जल कारारासंदर्भात भाष्य करत भारताला थेट इशारा दिला. 'मी सिंधू नदीच्या काठावर उभा राहून भारताला स्पष्टपणे सांगतोय की, सिंधू (नदी) आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर या नदीतून आमचं पाणी वाहील नाहीतर मग इथं आमच्याच रक्ताचे पाट वाहतील...', असं भुट्टो म्हणाले. 

बिलावल भुट्टो जरदारी यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली जाण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली. पाक नेते भुट्टो यांनी भारतानं सिंधूवर हल्ला केल्याचं म्हणत देशाला हल्लेखोर म्हटलं. भारताची लोकसंख्या आमच्याहून जास्त असेल मात्र पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानातही लढा देऊ, असं सांगत आमचा आवाजच भारताला सडेतोड उत्तर देईल याचाच पुनरुच्चार त्यांनी केला. 

हेसुद्धा वाचा : 'सर तन से जुदा'चा इशारा; लंडनमध्ये पाकिस्तानी मुत्सद्दी अधिकाऱ्याचा थयथयाट, व्हिडीओ व्हायरल 

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीसुद्धा सिंधू जल कारारासंदर्भातील तणावपूर्ण वातावरणात आपल्या जळजळीत वक्तव्यानं आणखी भर टाकली. 'पाकिस्तानला पुरवलं जाणारं पाणी कमी केलं किंवा वळवण्याचा प्रयत्न जरी केला तरी याचं उत्तर पूर्ण ताकदीनं दिलं जाईल, कोणीही इथं काहीही चूक करुच नये' असं म्हणत शांतता आमची प्राथमिकता असली तरीही अखंडता आणि सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतीच तडजोड करणार नसल्याची भूमिका मांडत त्यांनीसुद्धा भारताविरोधात सूर आळवला. 

Read More