Marathi News> भारत
Advertisement

पाकिस्ताननं अडवली भारताची हवाई वाट; सामान्यांच्या खिशाला भुर्दंड, आता कुठून जाणार विमानं?

Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानच्या या एका निर्णयामुळं भारतीय विमान प्रवासात होणार मोठे बदल. नेमका काय परिणाम होणार? पाहा सविस्तर माहिती...   

पाकिस्ताननं अडवली भारताची हवाई वाट; सामान्यांच्या खिशाला भुर्दंड, आता कुठून जाणार विमानं?

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम (Jammu Kashmir) दहशतवादी हल्ल्यानंतर याचा तीव्र निषेध करत भारत सरकारनं पाकिस्तानची धोरणात्मक तत्त्वांवर कोंडी करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. सिंधु जल करारापासून ते अगदी सीमेवरून होणाऱ्या व्यवहारांपर्यंत सर्वत गोष्टींवर भारतानं निर्बंध आणले. ज्यानंतर पाकिस्ताननंही भारताच्या या कारवाईला उत्तर देत असाच एक परिणाम घेतला. जिथं भारताशी असणारं नातं जवळपास संपुष्टात आणण्यासाठी शेजारी राष्ट्रानंही काही घोषणा केल्या. 

पाकिस्तानच्या नॅशनल सिक्योरिटी कमिटीनं (NSC) 1972 चा शिमला करार रद्द करत सर्व द्वीपक्षीय करारांवर स्थिगिती आणली. इतक्यावरच न थांबता भारतासाठी पाकिस्ताननं आपली विमानतळं आणि एअरस्पेसही बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. भारताच्या उच्चस्तरीय बैठकीतील निर्णयाचा घाव जिव्हारी लागल्यानंतरच पाकिस्ताननंही भारताला डिवचणारे काही निर्णय घेतले. 

विमानतळ, एअरबेस बंद केल्याचा भारतावर कसा परिणाम होणार? 

दरम्यान, पाकिस्तानकडून एअरबेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या उड्डाणांवर होताना दिसणार आहे. जिथं दिल्ली, लखनऊ, चंदीगढ आणि अमृतसर यांसारख्या शहरांमधून युरोप, अमेरिका आणि दुबईसह पश्चिम आशियाच्या दिशेनं जाणारी विमानं आता गुजरात किंवा महाराष्ट्राच्या वाटेनं अरबी समुद्राच्या दिशेनं वळवण्यात येतील. या साऱ्यामध्ये प्रवासाचा आणि विमानाच्या उड्डाणाचा वेळ तब्बल 70 ते 80 मिनिटांनी वाढणार आहे. 

पाकच्या या निर्णयानंतर आता भारतीय विमानांना इंधनासाठी अधिक रक्कम खर्च करावी लागणार असून, त्यामुळं विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनासुद्धा याचा फटका बसणार आहे. याआधी 2019 मध्ये अनुच्छेद  370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा एअरस्पेस बंद करण्यात आला होता. तेव्हासुद्धा भारतील विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना जवळपास 700 कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता, जिथं एअर इंडियानं अधिक आव्हानांचा सामना केला. परिणामस्वरुप विमानाचे तिकिट दर गगनाला भिडले होते. येत्या काही दिवसांमध्येही असंच चित्र पाहायला मिळू शकतं. 

हेसुद्धा वाचा : Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये पुन्हा... निष्पापांचा बळी घेणारे ते दहशतवादी अद्यापही त्याच जंगलात? 

एका प्रतिष्ठित वृत्तसमुहाच्या माहितीनुसार पाकिस्ताननं गतकाळात जेव्हा असा निर्णय घेतला, तेव्हा भारताला दणका देण्याचा त्यांचा हेतू असूनही सर्वाधिक तोटा मात्र पाकिस्तानलाही सोसावा लागला आणि यावेळीसुद्धा परिस्थिती वेगळी नाही. त्यावेळी पाकला एअरस्पेर बंद केल्यानं 50 मिलियन डॉलर म्हणजे साधारण 400  कोटींचं नुकसान झालं होतं. यावेळीसुद्धा परिस्थिती वेगळी नसेल. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता त्यांचाच हा निर्णय नेमका कोणता धडा शिकवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More