Pahalgam Terror Attack Latest Update : जम्मू काश्मीरच्या पहलगाम क्षेत्रामध्ये 22 एप्रिल 2025 रोजी पाच ते सहा दहशवाद्यांनी पर्यटकांना निशाण्यावर घेत एकच हाहाकार माजवला. सहसा चहा-कॉफी किंवा अल्पोपहारासाठी पर्यटक जिथं येतात तिथंच अचानक गोळीबार सुरू झाला आणि एका क्षणात 26 जणांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून, बायका- मुलांच्या मनात भीती टाकून हे दहशतवादी पसार झाले.
जोपर्यंत संरक्षण यंत्रणांना यासंदर्भातील माहिती मिळाली, तोपर्यंत फार उशिर झाला होता. नंदनवनातील एका सुरेख ठिकाणी अनेकजण मृत्यूशय्येवर होते. मुळात पहलगाम हे गर्द झाडीचं वनक्षेत्र. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इथं 10 फुटांपर्यंत बर्फाची चादरस पाहायला मिळते. अशा या भागात जिथं सामान्यांना जगणं आव्हानात्मक ठरतं तिथंच दहशतवादी कारवाया करणाऱ्यांसाठी मात्र इथं बरंच फोफावतं. हे वनक्षेत्र पहलगामपासून ते अगदी अनंतनाग जिल्ह्यातील तरालपर्यंत पसरलं असून, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये याच जंगलात लपून बसलेले दहशतवादी या भागातून खालच्या दिशेला येऊन तिथं तळ ठोकतात. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागताच इथं पुन्हा दहशतवादी कारवाया आणि घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढते.
याच वनक्षेत्रामध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिलं जातं. काश्मीरच्या खोऱ्यात नेमका कुठे पहारा आहे, कुठे शोधमोहिम सुरू आहे, कुठे गस्त आहे या साऱ्याची माहिती या कावेबाजांना असते. वन क्षेत्रांमध्ये चालण्यापासून ते लष्कराला चकवा देत पळ काढण्यापर्यंतचं प्रशिक्षण या दहशतवाद्यांना दिलं जातं.
महत्त्वाची बाब म्हणजे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांनी 10 मिनिटं बेछूट गोळीबार केला आणि त्यानंतर ते आल्या पावती त्याच मार्गानं मागे पळ काढताना दिसले जिथून ते आले होते. काही क्षणांत इथं लष्कर येणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती, त्यामुळं त्यांनी याच गर्द वनांचा आधार घेत ते तिथं दिसेनासे झाले. लष्कर आणि स्थानिक पोलीस यंत्रणांनी तातडीनं या वनक्षेत्रामध्ये शोधमोहिम हाती घेतली मात्र तरीही हे दशहतवादी सापडले नाहीत. अद्यापही पहलगामच्या या वनक्षेत्रामध्ये त्यांचा वावर असल्यामुळं या संपूर्ण भागाला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सतर्कतेचा इशारा देत पुन्हा अशी अप्रिय घटना घडणार नाही, यासाठीच संरक्षण यंत्रणा प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी वनक्षेत्राचा संपूर्ण परिसर पिंजून काढला असता तरीही काही खाचखळगे आणि गुप्त ठिकाणांचा पत्ता मात्र अद्यापही कोणालाच नसल्यानं तिथंच दहशतवादी दडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला हा संपूर्ण भाग अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, येथील प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर यंत्रणा करडी नजर ठेवत पुन्हा अशी घटना घडणार नाही याची सतर्कता बाळगत आहेत.