MEA Press Conference on Pakistan Violation: शस्त्रसंधीवर एकमत झाल्यानंतर फक्त 3 तासातच पाकिस्तानने उल्लंघन केल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती दिली आहे. मागील काही तासांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या निर्णयाचं उल्लंघन केलं जात आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. पाकिस्तानने ही परिस्थिती नीट समजून घ्यावी आणि घेतलेल्या निर्णयाचं पालन करावं असंही त्यांनी सुनावलं आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये एक समझोता झाला. गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या सामंजस्याचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय सैन्य या सीमेवरील घुसखोरीला प्रत्युत्तर देत आहे आणि त्याचा सामना करत आहे".
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "An understanding was reached this evening between the DGMOs of India and Pakistan to stop the military action that was going on for the last few days. For the last few hours, this understanding is being violated by Pakistan.… pic.twitter.com/BNGnyvTnUH
— ANI (@ANI) May 10, 2025
"ही घुसखोरी अत्यंत निंदनीय आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्हाला वाटते की पाकिस्तानने ही परिस्थिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी त्वरित योग्य कारवाई करावी," असंही त्यांनी म्हटलं आहे.
सशस्त्र दल परिस्थितीवर कडक नजर ठेवत आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा तसेच नियंत्रण रेषेवर सीमेवरील उल्लंघनाच्या पुनरावृत्तीच्या कोणत्याही घटनांना कठोरपणे सामोरे जाण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.