भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. पण असं असतानाही भारतामधील काही जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सीमकार्ड अॅक्टिव्ह राहत असल्याचं समोर आलं आहे. सीमेला लागून असलेल्या भारतातील काही शहरांमध्ये पाकिस्तानी मोबाईल नेटवर्कचा सिग्नल येतो. यामुळे तस्करी करणारे या सीमकार्डचा वापर करुन सहजपणे वाचतात. पण अखेर पाकिस्तानी सीमकार्ड भारतात कसं काय वापरलं जातं, आणि त्याला नेटवर्क कसं मिळतं हे जाणून घ्या.
भारतात असे अनेक जिल्हे आहेत जे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत आणि तिथे काही अंतरापर्यंत पाकिस्तानी सिमचे नेटवर्क आहे. अलिकडेच भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातून बातम्या येत होत्या की पाकिस्तानी नेटवर्क जिल्ह्यात 3 ते 4 किलोमीटरपर्यंत मिळत आहे. या नेटवर्क्सचा वापर करून, पाकिस्तानी नागरिक भारतात कॉल करण्यासाठी देखील सीमचा वापर करु शकतात. जैसलमेर प्रशासनाने या सीमच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. जैसलमेर व्यतिरिक्त, अमृतसर, श्रीगंगानगर सांबा, कठुआ, जम्मू, राजौरी, पूंछ येथेही पाकिस्तानचे मोबाइल नेटवर्क दिसून आले आहेत.
इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, दूरसंचार क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कोणत्याही मोबाईलचे नेटवर्क दुसऱ्या देशाच्या सीमेत 500 मीटरपर्यंत मिळू शकतं. पाकिस्तानकडून या आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केलं जातं. पाकिस्तानचे हे मोबाईल सिग्नल देशाच्या सुरक्षेसाठी धोका आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या 2012 च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने आपल्या कटाचा भाग म्हणून जैसलमेर, बिकानेर, बारमेर आणि गंगानगर यांसारख्या भारताच्या सीमावर्ती जिल्ह्यांभोवती मोबाईल टॉवर उभारले आहेत. त्यावेळी त्यांचे सिग्नल 15 ते 20 किलोमीटरपर्यंत आत पोहोचत होते, जे आता 3 ते 4 किलोमीटरपर्यंत पोहोचत आहेत. अशाप्रकारे, वेगळा देश असूनही, पाकिस्तानी सिमला भारतात नेटवर्क मिळते. भारतात पाकिस्तानी सिम वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे. भारतात पाकिस्तानी सिम वापरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाते.