Marathi News> भारत
Advertisement

'ट्रम्पनी फोनवर म्हटलं नरेंदर सरेंडर....', राहुल गाधींचा PM नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले 'भाजपा-RSS वाले जरा दबाव टाकला की....'

Rahul Gandhi on Pm Modi: काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाचा उल्लेख करत राहुल गांधींनी आरोप केला की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मसमर्पण केलं.   

'ट्रम्पनी फोनवर म्हटलं नरेंदर सरेंडर....', राहुल गाधींचा PM नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले 'भाजपा-RSS वाले जरा दबाव टाकला की....'

Rahul Gandhi on Pm Modi: भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाचा उल्लेख करत करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) वारंवार आपण मध्यस्थी केल्यानेच दोन्ही देशांनी एक पाऊल मागे घेतल्याचा दावा करत आहेत. भारताने मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प अशाच प्रकारची विधानं करत आहेत. दुसरीकडे विरोधक यासंबंधी वारंवार केंद्र सरकारला विचारणा करत आहे. नुकतंच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केला आहे की, ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर सरेंडर झाले आहेत. 

एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधींनी म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फोन आला आणि नरेंद्र मोदींनी लगेच सरेंडर म्हणजेच आत्मसमर्पण केलं. इतिहास साक्षीदार आहे, हेच भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कॅरेक्टर आहे. हे नेहमी झुकतात. "भाजपा-आरएसएसवाल्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो. यांच्यावर थोडासाही दबाव टाकला, धक्का मारला तर घाबरुन पळून जातात".

राहुल गांधी काय म्हणाले आहेत?

राहुल गांधी पुढे म्हणाले, "ट्रम्पने तिथून (अमेरिकेतून) इशारा केला, फोन उचलला आणि म्हटलं मोदीजी तुम्ही काय करत आहात? नरेंदर-सरेंडर. मग नरेंद्र मोदींनी जी हुजूर म्हणत ट्रम्प यांच्या इशाऱ्याचे अनुसरण केले. तुम्हाला तो काळ आठवत असेल जेव्हा फोन कॉल आला नव्हता, सेवंथ फ्लीट आली होती. 1971 च्या युद्धात शस्त्रे आली होती, विमाने आली होती पण इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की मी जे काही करायचे आहे ते करेन, हाच फरक आहे".

"यांचं हेच कॅरेक्टर आहे. हे सगळे असेच आहेत. स्वातंत्र्यापासून आत्मसमर्पणाची चिठ्ठी लिहिण्याची सवय आहे. जरा दबाव टाकला लगेच एका सेकंदात चिठ्ठी लिहितात. काँग्रेस पक्ष सरेंडर करत नाही. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल हे सरेंडर करणारे लोक नाहीत, हे सुपर पॉवरशी लढणार लोक आहेत," असंही ते म्हणाले. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती. 6 मेच्या रात्री भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर लाँच करत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली होती. 

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढू लागला होता. यानंतर 10 मे रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी दोन्ही देशात युद्धविराम झाल्याची घोषणा केली होती. यानंतर काही वेळातच भारत आणि पाकिस्तानने अधिकृतपणे युद्धबंदीवर एकमत झाल्याचं जाहीर केलं होतं. 

Read More