Insulting Remark On Kangana Ranaut In Assembly: हिमाचल प्रदेशचे महसूल मंत्री जगत नेगी यांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदार तसेच अभिनेत्री कंगना रणौतवर टीका केली आहे. ही टीका करताना नेगी यांनी, "कंगना पावसाचा फटका बसलेल्या हिमाचलला, सर्व काही पूर्वव्रत झाल्यानंतर आली कारण पावसामुळे तिचा मेकअप खराब झाला असता," असा टोला लगावला. नेगी यांच्या या टीकेवरुन नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
"भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांनी पूराचा फटका बसलेल्या भागांना तेव्हा भेट दिली जेव्हा सर्व काही पूर्वव्रत झालं होतं. पावसामुळे त्यांचा मेकअप खराब झाला असता आणि त्यांना कोणी ओळखू शकलं नसतं. तिच्याऐवजी तिची आईच आलीय असं अनेकांना वाटलं असतं," असं विधान नेगी यांनी हिमाचलच्या विधान परिषदेमध्ये बोलताना केलं.
कंगना रणौत मागील महिन्यामध्ये आपल्या गृहराज्याला भेट दिली. तिने तिच्या भेटीदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. "लोकांनी सारं काही गमावलं आहे. या साऱ्याचं मला फार वाईट वाटत आहे. आमची एकच आशा आहे ती म्हणजे पंतप्रधान मोदी," असं कंगनाने म्हटलेलं.
नक्की वाचा >> 'सिरीअल स्कर्ट चेसर' विधानावर कंगना ठाम! म्हणाली, '...जसा काही तो स्वामी विवेकानंद आहे'
"कंगनाजी येथे तेव्हाच आल्या जेव्हा मदतकार्य पूर्ण झालेलं आणि परिस्थिती, वातावरणात सुधारणा झाली होती. मुंबईत राहून त्यांनी ट्वीट केलं होतं की त्या इथे येऊ शकत नाही कारण या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्या केवळ प्रसिद्धीसाठी इथे आल्या होत्या," असंही नेगी म्हणाले.
Congress Minister Jagat Negi -
— News Arena India (@NewsArenaIndia) September 4, 2024
"BJP MP Kangana Ranaut visited the flood-affected areas when everything settled down, as rain would ruin her makeup and people might not recognize her without it, mistaking her for her mother."@KanganaTeam pic.twitter.com/G4wdCsQQLx
सध्या हिमाचलला पावसाने झोडपून काढलं आहे. हिमाचलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मागील महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यातील अनेक ठिकाणी रस्ते, पूल आणि मूलभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. नेगी यांनी राज्यामध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस पडल्याने तब्बल 12 हजार कोटींचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.
अनेक भागांमध्ये घरांबरोबरच प्राण्यांचे गोठे, शेत जमिनींवरील पिकांना फटका बसला असून गुरंढोरं वाहून गेल्याचं महसूल मंत्र्यांनी विधानसभेत निवदेन करताना सांगितलं. "आपल्या येथील नियमांनुसार तुमचं कायम स्वरुपी घराला नुकसान झालं असेल तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीमधून 1 लाख 30 हजार रुपये मदत दिली जाते. तर थोडं नुकसान झालं असेल तर 12 हजारांची मदत दिली जाते. पुरेसे स्त्रोत नसतानाही हिमाचल प्रदेश सरकारने विशेष आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून मदत केली आहे," असं महसूल मंत्री म्हणाले. पुढे बोलताना, "यंदाच्या वर्षीही समीज येथे अपघातामध्ये 34 जणांच मृ्त्यू झाला आहे. दुसरा अपघात कुलू जिल्ल्यात झाला. तिसरा अपघात मंडीमध्ये झाला ज्या ठिकाणी 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला," असं नेगी म्हणाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.